नवी दिल्ली/दै.मू.वृत्तसेवा
यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाकडून ‘अबकी बार 400 पार’ अशी घोषणा देण्यात आली आहे. भाजपा आणि मोदी यांच्याकडून करण्यात येत असलेल्या 400 पार जागा जिंकण्याच्या दाव्यावर विरोधी पक्षाकडून शंका उपस्थित केली जात आहे. अशातच आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांच्यानंतर कांग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनीही भाजपच्या ‘अबकी बार 400 पार’ या दाव्यावर शंका उपस्थित केली आहे. भाजपाने आधीच काही तरी गडबड करून ठेवली आहे. त्यामुळे त्यांना 400 जागा जिंकणार हे कळलंय, असा दावा प्रियंका गांधी यांनी केला आहे.
प्रियंका गांधी ह्या आज उत्तर प्रदेशमधील सहारनपूर येथे रोड शोमध्ये सहभागी झाल्या होत्या. तिथे त्या म्हणाल्या की, यांनी आधीच काहीतरी गडबड करून ठेवलेली आहे. तेव्हाच 400 पार जागा जिंकणार हे कळलं आहे. जर देशामध्ये अशा निवडणुका झाल्या ज्यात ईव्हीएममध्ये कुठलीही गडबड झाली नाही तर मी ठामपणे सांगू शकते की, भाजपाला 180 पेक्षा अधिक जागा मिळणार नाहीत. कदाचित त्यापेक्षा कमीच जागा त्यांना मिळतील, असा दावा प्रियंका गांधी यांनी केला.
सहारनपूरमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रियंका गांधी यांनी आज सहारनपूरमध्ये रोड शो केला. यावेळी त्या म्हणाल्या की, त्यांचे नेते प्रत्येक ठिकाणी सांगताहेत की, घटना बदलली जाणार आहे. जर घटना बदलली गेली तर आरक्षणाचं काय होणार? सर्वांच्या मताधिकाराचं काय होणार. याचं उत्तर दिलं पाहिजे. भाजपवर हल्लाबोल करताना प्रियंका म्हणाल्या, ‘आज जे सत्तेत आहेत ते मातृशक्ती आणि सत्याचे उपासक नाहीत तर सत्तेचे उपासक आहेत.’ सत्तेसाठी तो कोणत्याही थराला जाईल. सरकार पाडतील, आमदार विकत घेतील आणि देशाची संपत्ती श्रीमंतांना देतील.
यापूर्वी आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी देखिल भाजपच्या 400 पार या दाव्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. भाजपवर निशाणा साधत तेजस्वी यादव म्हणाले की ते 400 पार करण्याचा नारा देत आहेत. ईव्हीएममध्ये आधीच सेटिंग असल्याचे दिसते, असा आरोप त्यांनी केला होता.