इगतपुरी/दै.मू.वृत्तसेवा
स्वातंत्र मिळाल्यानंतर देशात अनेक पक्षाचं सरकार अलं आणि गेलं. परंतु आजही ग्रामीण भागातील लोक पुरेशा पायाभूत नागरी सुविधांपासून वंचित आहेत. इगतपुरी-त्र्यंबकेश्वरसारख्या आदिवासी दुर्गम भागात असणाऱ्या वाड्या-पाड्यांतही असीच स्थिती आहे. या भागातील अनेक आदिवासी वाडे-पाडे पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत. रस्त्यांसह मूलभूत सुविधाही मिळाल्या नसल्याने मारुतीवाडी, शिदवाडी, खैरेवाडी या वाड्या-पाड्यांतील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
नाशिक जिल्ह्यातील काही गावांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव परिसरातील लचकेवाडी, डोंगरवाडी, तोरणवाडी, गणेशनगर तसेच इगतपुरी तालुक्यातील खैरेवाडी रस्त्यापासून वंचित आहे. या गावांपर्यंत जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. त्यामुळे ग्रामस्थांना कायम विविध अडचणींना तोंड द्यावे लागते. पावसाळ्यात नदी, नाले, ओढ्यांना पाणी वाढल्यावर या वाड्यांपर्यंत पोहोचणे कठीण होते.
रस्ता नसल्याने गाडी पोहोचत नसल्याने रुग्णांना झोळी करुन न्यावे लागते. रस्त्यांअभावी या पाड्यांचा विकास होत नाही. अधिकारी, कर्मचारी या वाड्या, पाड्यांकडे येण्यास तयार होत नाहीत. विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान होते. इगतपुरी तालुक्यातील खैरेवाडी-कुरुंदवाडी परिसरातील मारुतीवाडी व खंबाळे परिसरातील शिदवाडी येथे रस्त्यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असूनही लोकप्रतिनिधींसह प्रशासनाकडून काणाडोळा केल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. या वाडीत अंगणवाडीही नाही. आवश्यक अशा कोणत्याच नागरी सुविधा मिळालेल्या नाहीत. जलजीवन योजनेतून आदिवासी वाडी, पाडे वगळण्यात आल्याचे एल्गार कष्टकरी संघटनेने म्हटले आहे.
खैरेवाडीला तर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन आढावा घेतला. मात्र, प्रत्यक्षात कार्यवाही सुरू झाली नाही. गेल्या पंधरा वर्षापासून याबाबत वेळोवेळी पाठपुरावा करूही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येते. जलजीवन योजनेच्या कामातही आदिवासी वाड्यापाड्यांचा समावेश करण्यात आलेला नाही. दळणवळणासह मूलभूत सुविधांचाही अभाव आहे. या परिसरातील सर्व वाड्या, पाडे आतापर्यंत लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी मतदान करत आले आहे. परंतु, या वाड्या, पाड्यांना कोणत्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात न आल्याने लोकसभा निवडणुकीवर ग्रामस्थांनी बहिष्कार टाकला आहे.
जोपर्यंत हक्काच्या नागरी सुविधा मिळत नाहीत, तोपर्यंत मतदान करणार नाही, असा इशारा एल्गार सामाजिक संघटनेच्या वतीने देण्यात आला असून त्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले आहे. आमच्या वाड्यापर्यंत विकास होईल, आदिवासींची प्रगती होईल, या आशेवर आम्ही आजपर्यंत लोकशाही मार्गाने मतदान करीत आलो. मात्र, आमची नेहमीच फसवणूक होत आहे. हक्काच्या मूलभूत सुविधाही मिळाल्या नाहीत. त्यामुळे मतदानावर बहिष्काराचा निर्णय घेतल्याचे श्रमजीवी संघटनेचे संस्थापक भगवान मधे यांनी निवेदनात नमूद केले आहे.
इगतपुरी तालुक्यातील कुरूंगवाडीजवळील मारूतीवाडी, खांबाळेजवळील शिंदवाडी, खैरेवाडी, त्र्यंबक तालुक्यातील लचकेवाडी, तोरंगवाडी, डोंगरवाडी, टाकेदेवगावजवळील गणेशनगर, बर्ड्यांची वाडी यांनी लोकसभा निवडणूक मतदानावर बहिष्कार टाकला आहे.