हैदराबाद/दै.मू.वृत्तसेवा
हैदराबाद केंद्रीय विद्यापीठातील पीएचडी स्कॉलर रोहित वेमुला आत्महत्या प्रकरणाचा तपास बंद करून पोलिसांनी सर्व आरोपींना क्लीन चीट दिली. रोहित दलित नव्हता. आपली खरी जात समोर येईल या भीतीने त्याने आत्महत्या केली, असा दावा करत हैदाराबाद पोलिसांनी या घटनेचा तपास बंद करण्याची घोषणा केली. आता रोहित वेमुलाची आई राधिका वेमुला यांनी पोलिस तपासावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. त्यांनी हे एक षड्यंत्र असल्याचं म्हटलं आहे. बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या.
रोहित दलित नव्हता असा पोलिसांनी अहवाल दिला आहे, यावर राधिका वेमुला म्हणाल्या, हे दावे खोटे आहेत. पोलिसांनी त्याची जात कशी ठरवली? जात प्रमाणपत्राच्या तपासात पोलिसांची भूमिका काय होती? आम्ही 2017-18 मध्ये हा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता. 2019, 2020, 2021 मध्ये करोनामुळे तपास होऊ शकला नाही. त्यामुळे तपास पूर्ण झाल्याशिवाय हा निर्णय कसा काय घेतला गेला? हे सर्व भाजपाचं षडयंत्र आहे, असा आरोप राधिका वेमुला यांनी केला.
रोहित एमएससी परीक्षेत पूर्ण भारतात पाचव्या स्थानावर होता. जेआरएफमध्ये दोनवेळा पात्र ठरला. त्याची प्रमाणपत्र खोटे नाहीयत. मी सर्व गोष्टी जनतेसमोर ठेवणार आहे. त्याला दलित न मानणं हे राजकीय षडयंत्र आहे. आम्ही सच्चे दलित आहोत, असंही त्या म्हणाल्या.
रोहित दलित नव्हता म्हणूनच त्याने आत्महत्या केली, अशीही चर्चा आहे, असं विचारल्यावर त्या म्हणाल्या, जर रोहित एससी प्रवर्गातून नसता तर त्याला विद्यापीठात प्रवेश कसा मिळाला असता? त्याच्या प्रमाणपत्राच्या तपासानंतरच त्याला प्रवेश दिला गेला. लोकांची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न आहे. रोहितचा मृत्यू दलिताच्या रुपात झाला आहे. तो दलित होता, म्हणूनच त्याचं विद्यापीठातून निलंबन केलं होतं. मृत्यूनंतर जातीला दोष देणं चुकीचं आहे, असं त्या म्हणाल्या.
तसंच, याप्रकरणातील तपास भाजपा आणि बीआरएसच्या लोकांव्यतिरिक्त केला गेला तर या प्रकरणात नक्कीच न्याय मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. रोहित वेमुलाच्या मृत्यूप्रकरणात जे दोषी आहेत त्या सर्वांना शिक्षा मिळाली पाहिजे, एवढीच माझी इच्छा आहे, असंही त्यांनी पुढे सांगितलं.
रोहित वेमुलाच्या मृत्यूसाठी जे कोणी जबाबदार आहेत, त्यांना शिक्षा व्हावी. दलित विद्यार्थ्यांवर हल्ले करणाऱ्यांना भीती वाटायला हवी. रोहित वेमुलासोबत जे घडलं, ते कोणासोबतही घडू नये म्हणून मी लढत आहे. देशातले सगळेच विद्यार्थी माझ्यासाठी रोहित सारखेच आहेत. मी माझा मुलगा गमावला आहे. कोणावरही ही वेळ येऊ नये, हीच आशा आहे
तेलंगणातील हैदराबाद केंद्रीय विद्यापीठातील पीएचडी स्कॉलर रोहित वेमुला याने 2016 रोजी आत्महत्या केल्यानंतर देशभरात आंदोलन उभे राहिले होते. रोहित वेमुलाला न्याय देण्यासाठी अनेक आंबेडकरवादी संघटना पुढे आल्या होत्या. या प्रकरणी तत्कालीन केंद्रीय मंत्री आणि सिकंदराबादचे तत्कालीन खासदार बंडारू दत्तात्रेय, आमदार एन. रामचंदर राव, हैदराबाद विद्यापीठाचे कुलगुरू अप्पा राव आणि तत्कालीन मानव संसाधन मंत्री स्मृती इराणी यांना आरोपी करण्यात आले होते.
मात्र तलंगणात होणार्या लोकसभा निवडणुकीच्या 10 दिवस आधी तेलंगणा पोलिसांकडून क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला. त्यात सर्व आरोपींना क्लीन चिट देण्यात आली आहे. रोहित वेमुला हा दलित नसून त्याच्या आईने बनावट प्रमाणपत्र बनवल्याचा दावाही करण्यात आला होता. पोलिसांच्या या अहवालावर प्रचंड संताप व्यक्त केला जात असून रोहितच्या कुटुंबीयांनीही अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.