नवी दिल्ली/दै.मू.वृत्तसेवा
अब की बार, 370 पार, एनडीए 400 पार’ अशी घोषणा देणारा भाजप पहिल्या दोन टप्प्यात कमी झालेल्या मतदानामुळे अगोदरच चिंतेत असून कर्नाटक उत्तर प्रदेश आणि राजस्थानातील विरोधाने पक्षाच्या प्रमुख नेत्यांची डोकेदुखी वाढवली आहे. कर्नाटकात लिंगायच समाजाचा विरोध आणि नेत्यांचं बंड तसेच यूपीत जाट आणि गुजरात, राजस्थानात राजपुत समाजाचा भाजपाला विरोध, यामुळे भाजपचं 400 पार धुळीच मिळण्याचे संकेत दिसून येत आहे.
कर्नाटकातील लिंगायतबहुल धारवाड लोकसभा मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीत प्रल्हाद जोशी यांच्यासह भाजपासमोर लिंगायत समाजाचे मोठे आव्हान आहे. लिंगायत समाजाच्या नाराजीमुळे गेली दोन दशके धारवाडचे प्रतिनिधित्व करणारे जोशी यंदा अडचणीत येतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. काँग्रेसने यंदा युवा ओबीसीचा उमेदवार उभा केला आहे. त्यामुळे जोशींसमोर कोणतेही आव्हान नसल्याचे मानले जात होते. परंतु, आता भाजपाला लिंगायत समाजाच्या नाराजीचा फटका बसण्याची शक्यता आहे.
धारवाड मतदारसंघात लिंगायत आणि मुस्लिमांना ‘गेम चेंजर’ मानले जाते. या मतदारसंघात 25 टक्के लिंगायत, तर 23 टक्के मतदार मुस्लीम आहेत. शिरहट्टी फकिरेश्वर मठातील प्रमुख दिंगलेश्वर स्वामी यांनी लिंगायत चेहरा आणण्याची मागणी केली होती. त्यामुळेही जोशी अडचणीत आले होते. जोशी हे ब्राह्मण आहेत. दिंगलेश्वर स्वामी यांनी जोशी यांच्यावर लिंगायत समाजाच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला होता. दिंगलेश्वर स्वामी यांनी या मतदारसंघातून अपक्ष लढण्याची तयारी दाखविली होती. मात्र, नंतर त्यांनी माघार घेतली असली तरी त्यांनी जोशींच्या विरोधातील मोहीम सुरूच ठेवली आहे. लिंगायत सामाजाच्या नाराजीचा परिणाम ईतर लोकसभा क्षेत्रात पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे नातू, जेडीएसचे हसन खासदार व उमेदवार प्रज्वल रेवण्णा यांच्यावर आता लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे भाजपाला पेच सहन करावा लागत आहे. पक्षाने जरी या प्रकरणापासून स्वतःला दूर ठेवले असले तरी हे प्रकरण भाजपाला लोकसभा निवडणुकीत अडचणीचे ठरू शकते.
दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गृहक्षेत्र असलेल्या गुजरातमध्ये क्षत्रिय समाज तापला आहे. राजकोट लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रूपाला यांनी ऐन निवडणूक काळात केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे संपूर्ण समाज पेटून उठलाय. सलग तिसऱ्या निवडणुकीत गुजरातमध्ये लोकसभेच्या 26 पैकी 26 जागा जिंकण्याचे भाजपाचे लक्ष्य आहे. परंतु, क्षत्रियांच्या नाराजीसमोर ‘मोदी मॅजिक’ किती प्रभावी ठरेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
निवडणुकीच्या पहिल्या सभेसाठी मोदी गुजरातमध्ये दाखल होण्यापूर्वी, राजपूत समाज संघटनांच्या समन्वय समितीने जाहीर केले की ते राजकोट येथील क्षत्रिय समिती कार्यालयात निदर्शनांची तयारी करत आहे. याचे नेतृत्व भाजपा राजकोट शहर युनिटचे माजी सरचिटणीस राजभा झाला करीत आहेत. आम्हाला अहंकारी भाजपला धडा शिकवायचा आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. जामनगर व कच्छसारख्या मतदारसंघात 11 टक्के व आनंदमध्ये 50 टक्के इतके क्षत्रिय असून त्यांनी या मतदारसंघांतील भाजपाच्या सभा उधळून लावल्या आहेत. राजभा झाला यांच्या मते, राजकोटमध्ये काँग्रेस उमेदवार परेश धनानी यांना पाठिंबा देणार्यांची संख्या वाढली आहे.
रूपाला यांच्या वक्तव्यानंतर करणी सेनेने याच्याविरोधात अनेक आंदोलने केली आहेत. समाजाची संरक्षक देवता असलेल्या आशापुरा माँ यांच्या सन्मानार्थ पाच ‘क्षत्रिय अस्मिता धर्म रथ’ क्षत्रिय बहुल गावातून फिरविले जात असून यात भाजपला मते न देण्याचं आवाहन करण्यात येत आहे. रथ मिरवणुकीचे नेतृत्व करणाऱ्या श्री करणी सेनेच्या स्थानिक युनिटचे अध्यक्ष उपेंद्रसिंह जडेजा म्हणतात की, क्षत्रिय महिलांनी सार्वजनिक ठिकाणी जाणे सामान्य नाही. पण, रूपाला यांच्या वक्तव्यांनी त्यांना खूप दुखावलं आहे. कारण हे वक्तव्य त्यांच्यावर करण्यात आल्याचे जडेजा सांगतात. रथयात्रेत काँग्रेसला मत देण्याची शपथ घेतली जाते. त्यांना दुसरा पर्याय नसल्यामुळे हे पाऊल उचलावे लागले असल्याचे ते म्हणतात.