अमरावती/दै.मू.वृत्तसेवा
राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत राबवली जाणारी (आरटीई) प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून प्रथमतः शाळा नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शाळा नोंदणीसाठी येत्या 18 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली असून शाळांची नोंदणी झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
शैक्षणिक वर्ष 2024-2025 करिता महानगर पालिका शाळा, नगरपालिका, नगरपंचायत, नगरपरिषद, स्वयंअर्थसहाय्यित, जिल्हा परिषद शासकीय, खासगी अनुदानित, स्वयंअर्थसहाय्य, ‘पोलिस कल्याणकारी, विनाअनुदानित अशा आरटीईअंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांना 18 मार्चपर्यंत नोंदणी करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत.
आतापर्यंत जानेवारी महिन्यात प्रक्रिया सुरू होऊन फेब्रुवारीत शाळा नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होऊन विद्यार्थी नोंदणी सुरु होत असे. परंतु यात अनुदानित, सरकारी शाळांचाही समावेश करण्यात आल्याने यंदा प्रक्रियेस उशीर झाला आहे. आता राज्यस्तरावर शिक्षण विभागाची बैठक होवून जिल्हास्तरावर शिक्षण विभागाची बैठक होणार आहे.
आर्थिक दुर्बल, गरीब विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी दृ खासगी शाळांमध्ये प्रवेश देत त्याचे शुल्क हे शासनाकडून दिले जाते. खासगी शाळांमध्येच आर्थिक दुर्बल घटकातील 25 टक्के जागांवर मुला-मुलींना प्रवेश देण्यात येत होता. परंतु आता शिक्षण विभागाने सरकारी तसेच अनुदानित शाळेच्या एक किलोमीटर परिसरात येणाऱ्या शाळांना यातून वगळले आहे. म्हणजे व या विद्यार्थ्यांना सरकारी शाळांमध्येच प्रवेश घ्यावा लागणार असल्याने खासगी शाळांसह सरकारी शाळांना देखील यात समाविष्ट केले आहे.
एका बाजूने शाळांची संख्या वाढविण्यात आल्याचे शिक्षण आयुक्तांकडून सांगण्यात येत असले तरीही अनेक खासगी शाळा यातून आता बाहेर पडल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बालकांच्या सक्तीच्या शिक्षणहक्क कायद्यानुसार आता सरकारी, अनुदानित शाळांमध्येच बहुतांशी मुलांना प्रवेश घ्यावा लागणार आहे.