I
नवी दिल्ली/दै.मू.वृत्तसेवा
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात मंगळवारी 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील ९३ मतदारसंघात मतदान पार पडलं. संध्याकाळी ६ वाजता मतदान संपलं तेव्हा देशभरात सुमारे 61 टक्के मतदानाची नोंद झाली. तर महाराष्ट्रात याच वेळेत 54.06 टक्के मतदान पार पडलं. यामध्ये महाराष्ट्रातील 11 मतदारसंघ, गुजरातमधील 25, उत्तर प्रदेशातील 10, कर्नाटकातील 14, मध्य प्रदेशातील 9, छत्तीसगडमधील 7, बिहारमधील 5, आसाम 4, पश्चिम बंगालमधील 4, गोव्यातील 2 आणि दोन केंद्रशासित प्रदेशातील मतदारसंघांचा समावेश होता. यांपैकी देशभरात सर्वाधिक मतदान 75.02 आसाममध्ये झालं तर सर्वात कमी 54.09 टक्के मतदान महाराष्ट्रात झालं.
संध्याकाळी सात वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाकडून उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार 63 टक्के मतदान झाले. 2019 मध्ये तिसऱ्या टप्प्यामध्ये 68.40 टक्के मतदान झाले होते. प्राथमिक आकडेवारीनुसार सुमारे मतदानामध्ये 5 टक्के घट झाली. तिसऱ्या टप्प्यातील मतदानाची ही आकडेवारी अंतिम नसल्याने हा आकडा वाढण्याचीही शक्यता असू शकते.
या दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदारसंघात संतापलेल्या एका मतदाराने मतदान करण्याऐवजी थेट ईव्हीएम मशीनला आग लावली. मतदान केंद्रावर असलेल्या अधिकाऱ्यांच्या आगीची घटना लक्षात येताच ताबडतोब संबंधित अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी आग विझवली. दादासाहेब मनोहर चळेकर असे या मतदाराचे नाव आहे. या घटनेनंतर मतदान केंद्रावरील मशीन बदलून नवीन मशीनवर मतदार प्रक्रिया राबविण्यात आली. बंदोबस्तसाठी तैनात असलेल्या पोलिसांनी ईव्हीएम मशीन पेटवणाऱ्या मतदाराला ताब्यात घेऊ गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. पेटवलेल्या ईव्हीएम मशीनमधील डेटा सुरक्षित आहे, मत मोजणीच्या वेळी अर्धवट जळालेली ईव्हीएम मशिनमधील मतदानाची मोजणी करण्यात येईल अशी अधिकृत माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
याशिवाय माढा लोकसभा मतदारसंघात मतदान संपण्यासाठी काही मिनिटे शिल्लक असताना करमाळा शहरात एका मतदाराने मतदान केंद्रात चक्क हातोडी घालून ईव्हीएम मशीन फोडल्याची घटना घडली. संबंधित तरूणाला तात्काळ पकडून पोलिसांच्या हवाली करण्यात आले.
रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये बाळगंगा प्रकल्पगस्तांनी आपलं पुनर्वसन झालं नसल्यामुळे मतदानावर बहिष्कार टाकला आहे. याप्रकरणी रायगड पोलीस अधीक्षकांनी मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो निष्फळ ठरला आहे. तसेच सोलापुरातील मनगुळी आणि भैरववाडी या दोन गावांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. गावात रस्ता नसल्याने गावकऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. दोन्ही गावांमध्ये सकाळपासून केवळ 8 जणांनी मतदान केलं. तर लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करण्याकरता मतदान केंद्रावर पायी जात असताना एका मतदाराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना महाड तालुक्यातील दाभेकर कोंड या ठिकाणी घडली आहे.
तर सांगलीतील काही मतदान केंद्रांवर बीप आवाजावरुन शंका उपस्थित झाल्या. बदण दाबल्यानंतर जेव्हा लाल दिवा लागतो तेव्हा मतदान झाल्याचे मानले जाते. त्यानंतर लगेचच बीपचा आवाज ऐकायला मिळतो. मात्र सांगलीतील काही केंद्रांवर बीपचा आवाज उशिरा येत असल्याने मतदार गोंधळून गेले. सांगलीच्या शांतिनिकेतन येतील केंद्रातील खोली क्रमांक ४ मधील यंत्रांबाबत हाच गोंधळ होता. रांगेत थांबलेल्या लोकांना बीपचा आवाज ऐकू येत नव्हता. त्यामुळे मतदान करतेवेळी ते कर्मचाऱ्यांसमोर शंका उपस्थित करीत होते. काहींनी बटण दीर्घकाळ दाबून धरण्याचा प्रयोग केला. यंत्राच्या बीपचा आवाज उशिराने येतो, असे सांगून कर्मचारी दमले. मतदान झाल्यानंतर मतदार दरवाजातून बाहेर पडत असताना अत्यंत मंदपणे बीपचा आवाज येत होता. एका मतदाराने याबाबतचे कारण कर्मचाऱ्यांना विचारल्यानंतर त्यांना उत्तर काय द्यायचे, असा प्रश्न पडला. व्हीव्हीपॅट मशिनवर स्लीप पाहून झाल्यानंतरही काही वेळाने बीपचा आवाज येत होता. त्यामुळे मतदान झाले की नाही, याबाबत शंका उपस्थित केल्या जात होत्या.