लखनौ/दै.मू.वृत्तसेवा
समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी सोमवारी उत्तर प्रदेशाच्या कन्नौज येथील गौरी शंकर महादेव मंदिरात जाऊन महादेवाचे दर्शन घेत आपल्या प्रचाराला सुरुवात केली. मात्र अखिलेश यादव मंदिरातून बाहेर पडताच भाजपाच्या काही कार्यकर्त्यांनी हे मंदिर गंगाजलने स्वच्छ केल्याचे एका व्हिडिओमधून समोर आले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून या घटनेमुळे उत्तर प्रदेशातील वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेवरून उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.
अखिलेश यादव हे मागासवर्गीय आहेत. त्यामुळेच भाजपाने मंदिर परिसर गंगाजलने स्वच्छ केला, तसेच मागास, दलित, वंचित आणि शोषित घटकांना हिंदू मंदिरात पूजा करण्याचा अधिकार मिळू नये, असे भाजपाचे मत आहे. त्यामुळे या निवडणुकीत उत्तर प्रदेशातील जनता भाजपाचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका समाजवादी पक्षाचे नेते आय.पी. सिंह यांनी केली आहे. योगी आदित्यनाथ पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले, तेव्हाही भाजपाने मुख्यमंत्री निवास गंगाजलने स्वच्छ केले होते. यावरूनच भाजपाची मानसिकता दिसून येते, असा टोलाही त्यांनी लगावला.
दरम्यान अखिलेश यादव यांनी मंदिराला दिलेल्या भेटीबाबत आमचा कोणाताही आक्षेप नाही. मात्र, यावेळी अखिलेश यादव यांच्याबरोबर काही मुस्लीम नेतेही मंदिरात दाखल झाले होते. त्यांनी बूट घालून मंदिर परिसरात प्रवेश केला. त्यामुळे आम्ही गंगाजलने मंदिर परिसर स्वच्छ केला, अशी प्रतिक्रिया भाजपाचे शहराध्यक्ष शिवेंद्र कुमार ग्वाल यांनी दिली.
अखिलेश यादव यांना कन्नौजमध्ये प्रचंड जनसमर्थन मिळत असल्याने भाजप घाबरू लागला आहे, असा आरोप सपाचे प्रमुख जिल्हा प्रवक्ताने केला आहे. ते म्हणाले कि भाजप राम आणि शिव यांना आपली संपत्ती मानू लागले आहेत. बाबा गौरी शंकर मंदिराची धुलाई करून भाजपने आपल्या तिरकस मानसिकतेचे दर्शन घडवले आहे. दुसरीकडे, बाबा गौरी शंकर मंदिर समितीचे अध्यक्ष राजेश श्रीवास्तव म्हणाले की, मंदिर धुण्याच्या प्रश्नात समितीची कोणतीही भूमिका नाही, काही लोकांनी याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळून 73 वर्षे उलटून गेली असूनही, येथील एससी/एसटीच्या लोकांना जात-आधारित समस्या आणि भेदभावाचा सामना करावा लागत आहे. यातच आता ओबीसीची देखिल भर पडली आहे. जसे की अनु.जातीच्या लोकांना मंदिरात प्रवेश करण्यापासून रोखण्यात येते. ओबीसींना मंदिरात प्रवेशापासून रोखले जात नाही, परंतु ते गेल्यावर मंदिर परीसर गंगाजलाने साफ करने हा जातीय भेदभावाचाच एक प्रकार आहे.