मुंबई/दै.मू.वृत्तसेवा
हेमंत करकरे यांना लागलेली गोळी कसाबच्या बंदुकीतील नसून ’आरएसएस’ समर्थक पोलीस अधिकाऱ्याच्या बंदुकीतील होती. मात्र न्यायालयात याबाबत पुरावे लपण्यात आले होते. ते पुरावे लपवणारे देशद्रोही कोण असेल, तर ते उज्ज्वल निकम आहेत, असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय. यावरच आता ‘हु किल्ड करकरे’ पुस्तकाचे लेखक माजी पोलीस अधिकारी एसएम मुश्रीफ यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी निकम यांच्यावर केलेले आरोप खरे असल्याचं म्हटल आहे. तसेच त्यांनी उज्वल निकम यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. भाजपाने ज्येष्ठ वकिल उज्ज्वल निकम यांना उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारी जाहीर केली आहे.
एसएम मुश्रीफ म्हणाले कि मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ला होणार अशी माहिती अमेरिकेच्या गुप्तचर संघटनांनी आयबी खात्याला दिलेली होती. मुंबईतील दोन हॉटेलवर हल्ला करण्यासाठी बोट निघाली असून त्याचे अक्षांश आणि रेखांश असे आहेत अशी ईत्तमभूत माहिती अमेरिकन एजन्सीकडून मिळाली असतानाही ही माहिती मुंबई पोलीस महाराष्ट्र शासन यांना देण्याची जबाबदारी गुप्तचर संघटनेचे तत्कालीन अधिकारी प्रभाकर अलोक यांची होती. पुढं ते म्हणाले की, या हल्ल्याची भारताच्या कॅबिनेट सेक्रेटरींमार्फत चौकशी झाली होती, या चौकशीत तत्कालीन प्रभाकर अलोक यांनी माहिती न दिल्यानं हा हल्ला झाल्याचं निष्पन्न झालं. या संपूर्ण चौकशीच्या बातम्या 11 डिसेंबर 2008 च्या अंकात प्रसिद्ध झाल्या होत्या.
या हल्ल्यात 168 नागरिकांनी आपले प्राण गमावले तर शेकडो लोक जखमी झाले होते. या सर्व गोष्टींना प्रभाकर अलोक जबाबदार असल्याचं सिद्ध झालं होतं, आणि ही माहिती या खटल्याचे सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी कोर्टाच्या निदर्शनाला आणणं जरूरीचं होतं. मात्र, त्यांनी ही माहिती जाणून-बुजून कोर्टाच्या निदर्शनास आणली नाही. आरएसएसच्या लोकांना वाचवण्यासाठी उज्ज्वल निकम यांनी हल्ला होऊ देणाऱ्यांना आणि ज्यांनी करकरेंना मारलं त्यांना वाचवलं. त्यामुळे उज्वल निकम हे या सगळ्या बाबीसाठी संपूर्णपणे जबाबदार आहेत. आणि त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी करत एसएम मुश्रीफ यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी निकम यांच्यावर केलेले आरोप खरे असल्याचं म्हटल आहे. तसंच करकरेंना कोणी आणि का मारलं याची माहिती ‘हु किल्ड करकरे?’ या पुस्तकात मी पुराव्यांसह दिली असल्याचंही मुश्रीफांनी सांगितलं.
टीव्ही 9 या वृत्तवाहिनीशी बोलत असताना एसएम मुश्रीफ म्हणाले, ‘मी ‘हु किल्ड करकरे’ हे पुस्तक लिहिले होते. आजवर या पुस्तकाच्या अनेक प्रती निघाल्या आहेत. मात्र उज्ज्वल निकम यांना भाजपाने उमेदवारी दिल्यानंतर या विषयाची पुन्हा चर्चा सुरू झाली. मलाही वाटत होते की, उज्ज्वल निकम यांज्याबद्दल बोलावे. कारण ते या सर्व प्रकरणात सरकारी वकील होते. सत्य लोकांपुढे आणण्याची त्यांची जबाबदारी होती. हेच सत्य मी पुस्तकाच्या स्वरुपातून समोर आणले होते.’
मुश्रीफ म्हणाले, एखाद्या व्यक्तीचा गोळीबारात मृत्यू झाल्यास, त्याच्या शरीरातील गोळ्यांचा बॅलेस्टिक रिपोर्ट काढला जातो. ज्या शस्त्रातून गोळ्या झाडल्याचा संशय असतो, त्या शस्त्रांचीही तपासणी केली जाते. हेमंत करकरे यांच्या शरीरात आढळलेल्या गोळ्या या अजमल कसाबच्या रायफलमधील किंवा त्याचा साथीदार इस्माइल याच्याही रायफलमधील नव्हत्या. बॅलेस्टिक चाचणी अहवालात ही बाब स्पष्ट केलेली आहे.
त्याचवेळी शवविच्छेदन अहवालत असे दिसले की, मानेच्या बाजूला खांद्यातून पोटात पाच गोळ्या मारल्यामुळे करकरेंचा मृत्यू झाल्याचे सांगितले गेले. त्यातील तीन गोळ्या निघून गेल्या. दोन गोळ्या पोटात अडकल्या. ही बाब उज्ज्वल निकम यांच्यासमोर आली होती. या गोळ्या कुणी झाडल्या याचा तपास करण्यास न्यायालयाला विनंती करणे हे सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची जबाबदारी होती. मात्र त्यांनी हे अहवाल कुठेही रेकॉर्डवर आणले नाहीत’, असा आरोप एसएम मुश्रीफ यांनी केला. तसेच राष्ट्रीय स्वंयसेवक संघाशी संबंधित असलेल्या दोन पोलिसांनी करकरेंवर गोळ्या झाडल्या आणि या दोघांना वाचविण्याचा प्रयत्न उज्ज्वल निकम यांनी केला असल्याचाही दावा एसएम मुश्रीफ यांनी केला आहे.