नाशिक/दै.मू.वृत्तसेवा
भाजपा आणि महायूतीन 400 पारचा नारा दिला असला तरी मतदान सुरू झाल्यापासून महायूतीची डोकेदुखी सतत वाढत आहे. त्यातच पहिल्या आणि दुसर्या टप्प्यात मतदानाची टक्केवारी घसरल्याने महायूतीचे टेंशन आणखी वाढले असताना आता शिवसेनेनं तिकीट नाकारल्यामुळे नाशिकमधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्यावर शांतीगिरी महाराज ठाम आहे. त्यामुळे महायूतीची धाकधूक आणखी वाढली आहे. त्यांच्यामुळे महायुतीच्या ४ जागांचे गणित बिघडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी 20 मे रोजी मतदान होणार आहे. सोमवार उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस आहे. अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले विजय करंजकर यांनी माघार घेत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसेंना पाठींबा दिला आहे. मात्र शांतीगिरी महाराज हे नाशिकमधून अपक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत.
जय बाबाजी भक्त परिवाराचे प्रमुख असलेल्या शांतीगिरी महाराजांना नाशिकमधून निवडणूक लढवायची होती. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नाशिकमधून विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना संधी दिली. त्यामुळे शांतीगिरी महाराज नाराज झाले. शांतीगिरी महाराजांचा मोठा भक्त परिवार नाशिक, दिंडोरी, धुळे, जळगावात आहे. महायुतीनं आपल्याला संधी द्यावी यासाठी त्यांचे प्रयत्न होते. पण महायुतीनं त्यांना तिकीट दिलं नाही. शिवसेनेकडून उमेदवारी मिळेल या आशेनं त्यांनी अर्ज भरताना पक्षाच्या कॉलममध्ये शिवसेनेचा उल्लेख केला. पण पक्षानं एबी फॉर्म न दिल्यानं त्यांचा अर्ज बाद झाला. पण महाराजांचा अपक्ष अर्ज कायम आहे.
उमेदवारी माघारी घेण्यासाठी शांतिगिरी महाराज यांना थेट दिल्लीपासून मनधरणीसाठी फोन आले. नाशिकमधील आजी-माजी पालक मंत्र्यांनी देखील स्वामी शांतिगिरी महाराजांची उमेदवारी मागे घेण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न सुरू ठेवले होते. मात्र स्वामी शांतिगिरी महाराज यांनी अपक्ष उमेदवारीचा निर्णय कायम ठेवला. त्यामुळे महायूतीच्या अडचणी वाढल्या असल्याचे चित्र आहे.
उत्तर महाराष्ट्रात जय बाबाजी भक्त परिवाराची संख्या मोठी आहे. महायुतीनं महाराजांना डावलल्याची भावना भक्त परिवारात आहे. त्यामुळे नाशिकमध्ये महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे अडचणीत आले आहेत. महाराज निवडणूक लढल्यास मतांचं ध्रुवीकरण होईल. त्याचा फटका गोडसेंना बसेल. मुख्यमंत्री शिंदेंनी नाशिकची जागा प्रतिष्ठेची केली. शेवटपर्यंत ताणून धरत ती खेचून आणवली खरी पण आता हीच जागा धोक्यात आली आहे.
दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील नांदगाव, निफाड, येवला, दिंडोरी विधानसभा मतदारसंघातही जय बाबाजी भक्त परिवाराचं प्रमाण मोठं आहे. इथल्या विद्यमान खासदार भारती पवार यांनाच भाजपनं पुन्हा उमेदवारी दिली आहे. त्यांनी उमेदवारी मिळाल्यानंतर शांतीगिरी महाराजांची भेट घेतली होती. सहकार्याची विनंती त्यांनी केली होती. नाशिकमध्ये काय होतं ते बघू, मग दिंडोरीत काय करायचं पाहू, असं त्यावेळी महाराजांनी म्हटलं होतं. त्यामुळे दिंडोरीत ३ लाखांच्या घरात असलेला भक्त परिवार पवारांविरोधात जाऊ शकतो.
नाशिकमध्ये शांतीगिरी महाराजांना मतदान आणि दिंडोरी, धुळे, जळगावात महाविकास आघाडीला छुपा पाठिंबा अशी भूमिका भक्त परिवारानं घेतल्यास महायुतीच्या चार जागा धोक्यात येतील. धुळ्याचे विद्यमान खासदार आणि भाजपचे उमेदवार सुभाष भामरेंनीदेखील त्यांना उमेदवारी मिळताच महाराजांची भेट घेतली होती. धुळ्यात असलेल्या परिवाराच्या मतदारांची संख्या पाहूनच ही भेट घेण्यात आली होती. महायुतीनं तिकीट नाकारल्यानं नाराज असलेला परिवार आता महाविकास आघाडीला सहकार्य करुन महायुतीला धक्का देऊ शकतो.
दरम्यान, जेव्हा राजसत्ता आपले कर्तव्य विसरते, तेव्हा धर्मसत्तेला पुढे यावं लागतं’ असा मजकूर शांतीगिरी महाराजांच्या होर्डिंग्सवर लिहिण्यात आला असून एकप्रकारे या माध्यमातून सूचक इशाराच महायुतीला देण्यात आला आहे.