मुंबई/दै.मू.वृत्तसेवा
लोकसभेच्या महाराष्ट्रात झालेल्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात मिळून 13 मतदारसंघामध्ये सायंकाळी ७ वाजेपर्यंत सरासरी 59.56 टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगानेच आपल्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केले होते. परंतु आता तेराही मतदारसंघातील अंतीम आकडेवारी 62.71 टक्के जाहीर करण्यात आली. नागपूर वगळता सर्वच ठिकाणी टक्केवारीत वाढ दाखविण्यात आली. यावरून विरोधी पक्ष निवडणूक आयोगावर शंका उपस्थित करत आहेत. आता यावरून राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी हात वर केले आहे. वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीची आकडेवारी आम्ही जाहीर केलेली नाही, त्यावर आम्ही कोणतेही उत्तर देऊ शकत नाही. यावर मुख्य निवडणूक आयुक्तच सांगू शकतील असे सांगितले.
सामना हिंदीच्या अनुसार, लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील दहा दिवसांनंतर निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीत अंतर आढळून आले आहे. महाराष्ट्रातही लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशी सायंकाळी ६ वाजता टक्केवारी जाहीर करण्यात आली आणि मतदानाची अंतिम टक्केवारी सरासरी 5.78 वरून 7.52 टक्क्यांवर पोहोचली आहे. यासंदर्भात पत्रकारांनी चोक्कलिंगम यांना प्रश्न विचारला असता त्यांनी तांत्रिक माहिती देण्यास सुरुवात केली.
चोक्कलिंगम म्हणाले की, मतदानाच्या दिवशी सकाळपासूनच विविध टप्प्यांत मतदानाची टक्केवारी जाहीर केली जाते. ही टक्केवारी अंदाजे आहे. मतदानाचा डेटा मतदानाच्या दुसऱ्या दिवशी रात्री येतो आणि अंतिम असतो. यासोबतच, मतदानाच्या दिवशी संबंधित मतदान केंद्रावरील मतदानाची अचूक आकडेवारी सर्व राजकीय पक्षांच्या निवडणूक प्रतिनिधींना फॉर्म 17 सी नुसार प्रदान केली जाते. हा डेटा त्यावेळी सील केला जातो, त्यानंतर कोणीही अंतिम बेरीज एक्सेस करू शकतो. यात कोणतीही गोपनीयता गुंतलेली नाही. चोक्कलिंगम म्हणाले की, त्यामुळे आता मतदानाची टक्केवारी अचानक वाढली असे कोणीही म्हणू शकत नाही.
मतदानाच्या टक्केवारीतील फरकावर पत्रकारांचे समाधान झाले नाही, त्यामुळे पत्रकारांनी पुन्हा प्रश्नांची सरबत्ती केली असता चोक्कलिंगम यांनी अस्पष्ट उत्तरे देऊन वेळ मारूण नेण्याचा प्रयत्न केला. प्रत्येकामध्ये उत्तर देण्याची एक क्षमता असते. ते म्हणाले की, आम्ही अकरा दिवसांनंतरही आकडेवारी जाहीर केलेली नाही, त्यामुळे आम्ही तुम्हाला यावर कोणतेही उत्तर देऊ शकत नाही. मतदानातील फरकाच्या प्रश्नाचे उत्तर केंद्रीय निवडणूक आयोग देईल, असे त्यांनी स्पष्ट सांगितले.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखिल आयोगाच्या आकडेवारीवर शंका उपस्थित केली आहे. ही वाढ अचानक कशी झाली, हे वाढलेले मतदान कुणी केले, कुठे गेले, 11 दिवस का लागले. हे प्रश्न देशातील जनतेला प्रश्न पडलेत. निवडणूक आयोग हा भारताचा राहिला नसून ते मोदी-शाह यांच्या हातातील बाहुले झालंय का? असा सवाल त्यांनी केला आहे.
तसेच एनसीपी (शरद पवार)गटाचे नेते अनिल देशमुख आयोगाच्या आकडेवारीवर शंका उपस्थित करत म्हणाले कि डिजिटल भारतात निवडणूक आयोगाकडून ही चूक झाली की मतदानाच्या टक्केवारीत वाढ करुन सरकारच्या दबावाखाली निवडणूक आयोग काही घोळ तर करीत नाही ना? डिजिटल युगात मतदानाचा टक्का वाढलाच कसा? निवडणूक आयोगावर केंद्रातील सरकारचा दबाव असल्याचे अनेक उदाहरण समोर आले आहेत. यात आता हा टक्केवारीचा घोळ समोर आल्याने आयोगाने भाजपाचे उमेदवार विजयी करण्यासाठी हा घोळ तर केला नाही ना? असा सवाल अनिल देशमुख यांनी उपस्थित केला आहे.
यापूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, टीएमसी नेते डेरेक ओब्रायन, सीपीएम नेते सीताराम येचुरी आणि काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनीही मतदानाची टक्केवारी वाढल्याबद्दलही चिंता व्यक्त केली आहे.
यापूर्वी निवडणूक आयोग मतदानाच्या टक्केवारीची अंतिम आकडेवारी 24 तासांत जाहीर करत असे. आता इतका वेळ का लागला, असा सवाल विरोधी पक्षांनी उपस्थित केला असून यामुळे निवडणूक निकालातही अनियमितता होण्याचा संशय विरोधी पक्ष व्यक्त करत आहेत.