नागपूर/दै.मू.वृत्तसेवा
भारतीय जनता पक्षाचे नागपूर येथील उमेदवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवडणूक प्रचारासाठी शाळकरी मुलांचा वापर केल्याचे सिद्ध झाले आहे. निवडणूक आयोगाने या प्रकरणी कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यामुळे नितीन गडकरी यांच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारदरम्यान नितीन गडकरीच्या रॅलीत काही शाळकरी विद्यार्थ्यांना सहभागी केल्याचं आढळून आल्यानंतर काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी यासंदर्भात निवडणूक आयोगाकडं एक तक्रार दाखल केली. त्या संदर्भात चौकशीनंतर निवडणूक आयोगाकडून कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत.
निवडणुकीसंदर्भातील कार्यक्रमात लहान मुलांचा वापर करू नये, असे निवडणूक आयोगाचे स्पष्ट निर्देश आहेत. तरी देखील गडकरी यांनी त्यांच्या प्रचारासाठी शाळकरी मुलांचा वापर केला. 1 एप्रिल 2024 रोजी एनएसव्हीएम फुलवारी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना दुपारी 12 ते 1 दरम्यान वैशाली नगर भागात गडकरींच्या प्रचार रॅलीत सहभागी करण्यात आले. हा अत्यंत गंभीर प्रकार आहे असे तक्रारीत नमूद करण्यात आले होते.
राजकीय प्रचारासाठी लहान मुलांचा वापर करणे हे बाल कामगार प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन तर आहेच तसेच मुंबई उच्च न्यायालयाने 2014 साली दिलेल्या आदेशाचेही उल्लंघन आहे, याकडे लक्ष वेधत निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेऊन कारवाई करावी, अशीमागणी लोंढे यांनी केली होती.
या प्रकरणी एनव्हीएम फुलवारी शाळा, वैशालीनगर, नागपूर या शाळेचे संचालक व मुख्याधापिका यांना सुनावणी सुनावणीसाठी बोलावण्यात आले. त्यांनी सादर केलेल्या लेखी खुलाशानुसार या प्रकरणी शाळा संचालक मुरलीधर पवनीकर हे दोषी आढळून आले आहे. त्यामुळे शाळेचे संचालकावर नियमानुसार कार्यवारही करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी यांना देण्यात आले आहे.
गडकरी यांच्या सभेत शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग आढळून आला आहे. या प्रकरणी निवडणूक आयोगानं शाळेवर कारवाईचे आदेश जारी केले. मात्र निवडणूक आयोगानं प्रस्तावित केलेली ही कारवाई चुकीची आहे. उमेदवारावरही कारवाई करण्यात यावी. शाळेतली मुलांना भर उन्हामध्ये सभेसाठी उभे ठेवणं उमेदवाराच्या दबावशिवाय होऊ शकत नाही. त्यामुळे सदरची कारवाई ही उमेदवारावर झाली पाहिजे. उमेदवारानं आचारसंहितेचा भंग केला आहे. अशी मागणी अतुल लोंढे यांनी केले आहे.