भोपाळ/दै.मू.वृत्तसेवा
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानादरम्यान राजगड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणारे दिग्विजय सिंह यांनी मतदान प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा महत्त्वपूर्ण आरोप केला आहे. ईव्हीएममध्ये छेडछाड करणे आणि टाकलेल्या मतांमधील विसंगतीचा आरोप त्यांनी केला आहे. दिग्विजय सिंह यांनी दावा केला कि राजगढमधील एका मतदान केंद्रावर 11 मते पडली आहेत, परंतु मशीन सांगत आहे की 50 मते पडली आहेत. अखेर एवढी मोठी चूक कशी झाली? त्यांनी ईव्हिएममध्ये गडबडीचा आरोप केला आहे.
दिग्विजय सिंह यांनी खळबळजनक आरोप करत म्हटले कि चचोडा येथील मतदान केंद्र क्रमांक 24 वर 11 मते पडली, पण मशीन 50 मते पडल्याचे सांगत आहे. हे काय आहे? सिंग म्हणाले की, ही माझी शेवटची निवडणूक आहे. मी 77 वर्षांचा झालो आहे. आता आम्ही नवीन मुलांना संधी देऊ, तेही 100 टक्के. दुपारी 3 वाजेपर्यंत राजगड जागेवर एकूण 63.69 टक्के मतदान झाले. जास्त मतदानाचा फायदा कोणत्या पक्षाला होतो हे आता 4 जून रोजी पहायला मिळणार आहे.
दिग्विजय सिंह यांनी मतदानाबाबत फसवणुकीचा आरोप केला असून काँग्रेस कार्यकर्त्यांना 100 मीटरच्या बाहेर पाठवले जात आहे आणि भाजपचे कार्यकर्ते 100 मीटरच्या आत श्रीरामाचा फोटो घेऊन बॅनर लावत आहेत. सिंह म्हणाले की, काँग्रेस नेते पंकज यादव यांना पोलिस ठाण्यात ठेवले आहे, तर भाजपमधील गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक मुक्तपणे फिरत आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राजगड लोकसभा ही मध्य प्रदेशातील सर्वात हॉट जागा ठरली आहे. माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने राजगढमधील लढत रोचक बनली आहे. दिग्विजय सिंह यांचा सामना भाजपच्या रोडमल नागर सोबत आहे.दिग्विजय सिंह यांना रोडमल नागर विरुद्ध सत्ताविरोधी लहरचा फायदा होऊ शकतो. राजगड हा दिग्विजय सिंह यांचा बालेकिल्ला मानला जाते. 33 वर्षांनंतर ते राजगडमध्ये परत आले आहेत. त्यांनी मागील लोकसभा निवडणूक भोपाळमधून लढवली होती, मात्र त्यांचा भाजपच्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर कडून पराभव झाला होता.