मुंबई/दै.मू.वृत्तसेवा
देशात लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गोयल यांचा राजीनामा स्वीकारला. गोयल यांच्या राजीनाम्यानंतर आता फक्त मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार हेच आयोगात आहे. या सर्व घटनेनंतर, शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी चुनाव आयोगाला ‘भाजपाचा चुना लगाव’ आयोग असल्याचा टोला लगावला.
निवडणूक आयुक्त अरूण गोयल यांचा नैतिकतेच्या मुद्द्यावर दिलेला राजीनामा नाही. मूळात ती नेमणूकच अनैतिक होती. अशी व्यक्ती नैतिक कारणासाठी कशाला राजीनामा देईल. ज्यांनी नेमलं त्यांनीच त्यांना दूर केलं. त्याजागी आणखी एक नियुक्त व्यक्ती येईल. ते आता भाजपाचीच विस्तारित शाखा म्हणून काम करतायत असं वाटतं. शेषन यांच्या काळातला निवडणूक आयोग आता राहिलेला नाही. चुनाव आयोग हा सध्या भाजपाचा चुना लगाव आयोग झालाय, अशी जळजळीत टीका संजय राऊत यांनी केली.
निवडणूक आयोग हा भाजपाच्या नेतेमंडळींच्या आदेशानुसारच काम करतोय हे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल दिल्या गेलेल्या निर्णयांवरून स्पष्ट झाले आहे. पक्षांतरविरोधी कायद्याची मोडतोड करून आयोगाला काही निर्णय घ्यायला लावले. तेव्हा भाजपाच्या दबावाखाली निवडणूक आयोगाने धृतराष्ट्र बनून काम केले.
निवडणूक आयुक्तांचा तडकाफडकी राजीनामा हा काही तरी मोदी-शाहांचा नवीन डाव असेल, असेही ते म्हणाल.
अरुण गोयल यांनी केंद्रीय निवडणूक आयुक्तपदाच्या तडकाफडकी दिलेल्या राजीनाम्याबाबत केंद्रीय निवडणूक आयोग, केंद्र सरकार व स्वतः गोयल यांनी संपूर्ण मौन बाळगले आहे. मात्र या राजीनाम्यामागे केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्याशी गोयलांचे झालेले मतभेद कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. यावरून विरोधकांनी केंद्र सरकार व भाजपला रविवारी लक्ष्य केले.
नियमावर बोट ठेवून काम करणारे अत्यंत शिस्तबद्ध अधिकारी अशी ख्याती असलेल्या गोयल यांचे राजीव कुमार यांच्याशी पश्चिम बंगालमधील लोकसभा निवडणुकीच्या आढाव्यावरून तीव्र मतभेद झाल्याचे सांगितले जात आहे. पश्चिम बंगाल दौरा अर्ध्यावर सोडून गोयल दिल्लीत परतले होते. त्यामुळे राजीव कुमार यांनी 5 मार्च रोजी एकटयाने पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर चारच दिवसांनी, शनिवारी गोयल यांनी आपला राजीनामा थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे पाठवला व तो त्याच दिवशी मंजूरही झाला. दोन्ही आयुक्तांमधील मतभेद टोकाला गेले असले तरी, इतक्या तडकाफडकी राजीनामा का दिला, हे अजून स्पष्ट झालेले नाही.
गोयल यांच्या राजीनाम्यावरून काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी केंद्र सरकार व भाजपला रविवारी लक्ष्य केले आहे. हे इलेक्शन कमिशन आहे की, इलेक्शन ओमिशन? लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना आयुक्त राजीनामा कसे देऊ शकतात? स्वायत्त संस्थांना वाचवले नाही तर देशात लोकशाहीवर हुकूमशाही कब्जा करेल, अशी टीका कांग्रेस अध्यक्ष खरगे यांनी केली आहे. आरजेडी खासदार मनोज झा म्हणाले की, ’फक्त विरोधकच प्रश्न उपस्थित करत नाहीत, सामान्य माणसाच्या मनात काय चालले आहे… संपूर्ण यंत्रणेत गडबड करत आहेस. आता तुम्ही केलेल्या कायद्यानंतर, कोणाला नेमायचे, कोणते प्यादे तिथे बसवायचे आणि एखादी स्क्रिप्ट सोपवायची हे सर्व अधिकार सत्तेत असलेल्या लोकांना आहेत. निवडणूक आयोगात आता फक्त एकच व्यक्ती उरली आहे. केंद्र सरकार टीका करत ते म्हणाले, आम्ही म्हणतोय तुम्ही निवडणूक का घेत आहात? कुठूनही 400-405 जागा मिळवा… निवडणुकीचे नाटक कशाला?असा सवाल त्यांनी केला आहे.
राज्यसभा खासदार कपिल सिब्बल म्हणाले कि हे नक्कीच आश्चर्यकारक आहे. काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या निवडणुकांपूर्वी तुम्ही राजीनामा दिलात तर साहजिकच काहीतरी गंभीर आहे ज्याच्या आधारे त्यांनी राजीनामा दिला असावा. मी कदाचित कारणाचा अंदाज लावू शकत नाही, परंतु स्पष्टपणे काही मतमतांतरे आहेत, विशेषतः त्यांचा कार्यकाळ अद्याप संपलेला नसल्यामुळे.’ याशिवाय एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, निवडणूक आयोग 13 मार्चनंतर कधीही निवडणुकीच्या तारखा जाहीर करणार आहे आणि त्याच्या काही दिवस आधी निवडणूक आयुक्त गोयल यांनी राजीनामा दिला आहे हे अतिशय धक्कादायक आहे.