हैदराबाद/दै.मू.वृत्तसेवा
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने ‘अब की बार 400 पार’, असा नारा दिला आहे. यावर विरोधी पक्षाकडून टीका करण्यात येत आहे. अशातच तेलंगणाचे सीएम रेवंत रेड्डी यांनी देखिल अब की बार 400 पार या दाव्यावर भाजपला टीका केली आहे. भाजपाला जर 400 हून अधिक जागा मिळवायच्या असतील तर त्यांना शेजारच्या बांगलादेश, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्येही निवडणूक लढवावी लागेल, असा टोला लगावला.
टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलत असताना रेवंत रेड्डी म्हणाले कि भाजपचा हा नारा व्हॉट्सअॅप विद्यापीठासाठी चांगला आहे. पण प्रत्यक्षात एवढ्या जागा मिळवणे भाजपाला शक्य होणार नाही. 400 पार जाणे हे भाजपासाठी दिवास्वप्न कसे ठरू शकते, याचेही विश्लेषण रेवंत रेड्डी यांनी केले.
ते म्हणाले, ‘भाजपाने राजस्थानमधील सर्व 25 जागा, गुजरातमधील 26, हरियाणातील 10, दिल्लीमधील 7, बिहारमध्ये 40, उत्तर प्रदेशमध्ये 62, पश्चिम बंगालमध्ये 18 आणि उत्तर भारतातील इतर ठिकाणांहून 80 ते 100 टक्के जागा जिंकल्या तरी ते 300 च्या आसपासच राहतात. तर दक्षिण भारतातील राज्यात 130 लोकसभा मतदारसंघ आहेत. याठिकाणाहून भाजपाला 15 पेक्षा अधिक जागा मिळणार नाहीत. त्यामुळे 400 पार जायचे असेल तर भाजपाला बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये काही जागा जिंकाव्या लागतील, अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे.
भाजपा किती जागा जिंकणार? याबाबतचे विश्लेषण रेवंत रेड्डी यांनी केल्यानंतर त्यांना काँग्रेस किती जागा जिंकणार याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना ते म्हणाले, काँग्रेस पक्ष हा इंडिया आघाडीतील सर्वात मोठा पक्ष आहे. इंडिया आघाडीला 270 हून अधिक जागा मिळतील. तेलंगणामधील 14 जागा काँग्रेसला मिळतील. तसेच केरळमध्ये सर्वच्या सर्व 20 जागा आम्ही जिंकू. तमिळनाडू आणि पुद्दुचेरीमधून आम्ही 40 जागा जिंकू. कर्नाटकमध्ये काँग्रेसला एकूण जागांच्या अर्ध्या जागा मिळतील.
मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी काही दिवसांपूर्वी तेलंगणात भारत राष्ट्र समिती आणि भाजपाची लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने संगनमत झाले असल्याचा आरोप केला होता. महबुबाबाद येथे जाहीर सभेत बोलत असताना रेवंत रेड्डी म्हणाले की, बीआरएस आणि भाजपा एकच आहेत. ते पडद्याआडून एकमेकांना मदत करत असतात. कारण त्यांना माहितीये की, ते लोकांसमोर उघडपणे एकत्र आले तर त्यांना मतं मिळणार नाहीत. ज्यापद्धतीने माजी मुख्यमंत्री केसीआर यांच्या कन्या के. कविता यांना जामीन मिळाला आहे. त्यावरून तरी बीआरएस भाजपासाठी पाच लोकसभा मतदारसंघात काम करत आहे, हे स्पष्ट होते.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून ‘अबकी बार 400 पार’ अशी घोषणा देण्यात आली आहे. भाजपा आणि मोदी यांच्याकडून करण्यात येत असलेल्या 400 पार जागा जिंकण्याच्या दाव्यावर विरोधी पक्षाकडून शंका उपस्थित केली जात आहे. आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांच्यानंतर कांग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनीही भाजपच्या ‘अबकी बार 400 पार’ या दाव्यावर शंका उपस्थित केली आहे. भाजपाने आधीच काही तरी गडबड करून ठेवली आहे. त्यामुळे त्यांना 400 जागा जिंकणार हे कळलंय, असा दावा प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशमधील सहारनपूर येथे केला आहे. ईव्हीएममध्ये कुठलीही गडबड झाली नाही भाजपाला 180 पेक्षा अधिक जागा मिळणार नाहीत. कदाचित त्यापेक्षा कमीच जागा त्यांना मिळतील, असा दावा प्रियंका गांधी यांनी केला.
यापूर्वी आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी देखिल भाजपच्या 400 पार या दाव्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. भाजपवर निशाणा साधत तेजस्वी यादव म्हणाले की ते 400 पार करण्याचा नारा देत आहेत. ईव्हीएममध्ये आधीच सेटिंग असल्याचे दिसते, असा आरोप त्यांनी केला होता.