मुंबई/दै.मू.वृत्तसेवा
लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी भाजप आणि त्यांच्या मित्रपक्ष राज्यात 48 पैकी 40 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा दावा करत आहे. मात्र सकाळ मीडिया ग्रुपच्या वतीने महाराष्ट्रात एक सर्व्हेक्षण करण्यात आले. त्यात भाजपप्रणित एनडीएला झटका बसत असून शिंदेसाठी धोक्याची घंटा असल्याचे समोर येत आहे सर्वेक्षणात एकूण 43.3 टक्के लोकांनी एनडीए आघाडीला तर इंडिया आघाडीला 45.7 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. तसेच 45 टक्के लोक केंद्र सरकारच्या कामावर नाराज असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले. जी एनडीए साठी धोक्याची घंटा आहे.
राज्यभरातून एकूण 34,978 लोकांची मते या सर्व्हेक्षणादरम्यान घेण्यात आली. सर्वेक्षणासाठी महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघ विधानसभा निहाय विभागून यादृच्छिक पद्धतीने नमुना निवड करण्यात आली आहे. यामध्ये आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळे प्रश्न विचारण्यात आले होते. मतदान करताना आपल प्राधान्य कोणत्या पक्षाला असेल असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी जनतेचा कौल भाजपप्रणित एनडीएला 43.3 टक्के लोकांनी तर इंडिया आघाडीला 45.7 टक्के लोकांनी पसंती दिली आहे.
यावेळी मतदारांना लोकसभेच्या आगामी निवडणुकीत मतदान करताना आपण कोणत्या पक्षाला पसंती देणार? असा प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा भाजपला 33.6 टक्के मतदारांनी पसंती दिली आहे. तर त्या खालोखाल काँग्रेस पक्षाला 18.5 टक्के मतदारांनी केल्याचे पाहायला मिळाले. तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) 12.6 टक्के, शिवसेना ठाकरे गटाला 12.5 टक्के इतक्या लोकांची पसंती मिळाली आहे. राष्ट्रवादी (अजित पवार) आणि शिवसेना (शिंदे) यांना अनुक्रमे 3.9 टक्के आणि 4.9 टक्के असा कल मिळालेला दिसतो. वंचित बहुजन आघाडीला 3.6 टक्के असा कल मिळाला आहे. तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या पक्षांतर्गत फुटीचा परिणाम या दोन्ही पक्षांच्या मुळ मतांच्या विभाजनावर होणार आहे असे दिसते.
या सर्व्हेक्षणात 44.5 टक्के लोकांनी केंद्र सरकारच्या कामावर समाधानी नसल्याचे म्हटले आहे. तर तब्बल 40 टक्के लोकांनी आपण समाधानी असल्याचे उत्तर दिले आहे. यामुळे केंद्र सरकारच्या कमांवर लोकांमध्ये नाराजी असल्याचे दिसून येत आहे.
खासदारांच्या कामगिरीबद्दल प्रश्न विचारला असता 50.6 टक्के लोकांनी खासदारांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे, तर 32.4 टक्के लोकांनी समाधान व्यक्त केलं आहे. सध्याच्या खासदारांच्या कामाच्या मूल्यमापनाचे हे आकलन खूप बोलके आहे. दोन पक्षात पडलेली फूट आणि विद्यमान खासदारांबद्दलची नाराजी यामुळे अनेक ठिकाणी आपल्याला नवीन चेहरे बघायला मिळाले तरी आश्चर्य वाटायला नको.
या सर्व्हेक्षणातून समोर आलेल्या निष्कर्षामध्ये महत्वाची बाब म्हणजे पक्ष म्हणून भाजपला क्रमांक एकची पसंती मिळाली असली तरी सर्व मतदारसंघात जिंकण्यासाठी आवश्यक मते मिळविण्याचे आव्हान भाजपासमोर असणार आहे. दुसरी बाब म्हणजे भाजपच्या मित्र पक्षांची ताकद मर्यादित असल्याचे या सर्व्हेक्षणातून स्पष्ट झाले आहे. परिणामी महाराष्ट्रात एनडीएसमोर महाविकास आघाडीचे आव्हान कायम असणार आहे. तसेच राज्यात अनेक ठिकाणी मतदार सध्याच्या खासदारांच्या कामगिरीबद्दल पुरेसे समाधानी नसल्याचे सांगतात, ही भाजन आणि एनडीएसाठी धोक्याची घंटा असू शकते.
सर्व्हेतून मोठी माहिती समोर आली आहे. 2019 पेक्षा शिवसेनेचं मतदान घटणार आहे. जरी एकनाथ शिंदे यांनी वेगळी चूल मांडली तरी देखील त्यांना फटका बसणार आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेपेक्षा मोठा फायदा होणार आहे. राज्यातील सर्वांत मोठा पक्ष म्हणून मतदारांनी भाजपाला पसंती दिली आहे. पण मित्रपक्षांची ताकद मर्यादित असल्याने त्यांच्यापुढेही मते मिळविण्यासाठी आव्हानांचा डोंगर असणार आहे. महाविकास आघाडी एकत्रितपणे लढण्यास त्यांचे मोठे आवाहन एनडीएसमोर असेल.