मुंबई/दै.मू.वृत्तसेवा
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना (यूबीटी) पक्षाला नोटीस पाठवली असून त्यामध्ये शिवसेनेच्या मशाल गीतात भवानी शब्द आल्याने गाण्यातील तो शब्द हटवण्यास सांगितले आहे. मात्र ठाकरे यांनी निवडणूक आयोगाचे नोटीस धुडकावून लावली आहे. निवडणुकीत हिंदुत्वाचा प्रचार करणाऱ्या मोदी-शाह यांच्यावर आधी कारवाई करा, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला ठणकावले आहे.
ठाकरेंनी रविवारी पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदी आणि शाह यांच्या व्हिडीचा पुरावा देत निवडणूक आयोगाला सवाल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याकडून उघड-उघड हिंदुत्वाचा प्रचार सुरू आहे, असं सांगत ठाकरेंनी शाह आणि मोदींचा व्हिडीओ दाखवला. निवडणुकीत हिंदुत्वाचा प्रचार करणाऱ्या मोदी-शाह यांच्यावर कारवाई का नाही, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला केला.
गेल्या काही दिवसांपूर्वी मध्यप्रदेश, तेलंगणा या निवडणुकीवेळी आम्ही निवडणूक आयोगाला एका व्हिडीओची विचारणा केली होती. या व्हिडीओत आमचं सरकार आणल्यावर प्रभू श्रीरामाचं दर्शन मोफत करु, असं अमित शाह म्हणाले. बजरंग बलीचं नाव घेत पंतप्रधान मोदींनी प्रचार केला. हिंदुत्वाचा प्रचार करणाऱ्या मोदी-शाहांवर आधी कारवाई करा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, मशाल गीतात भवानी शब्द आल्याने निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आहे, या नोटीसमध्ये गाण्यातील तो शब्द हटवण्यास सांगितला आहे. आम्ही हा शब्द हटवणार नसल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे म्हणाले कि आमच्या गीतातून धार्मिक प्रचार होत असेल तर मोदी आणि शाहांच्या धार्मिक प्रचार करणाऱ्या वक्तव्यावर आधी कारवाई करा.
ठाकरे गटाला अंधेरी पोटनिवडणुकीच्या वेळी ‘मशाल’ चिन्ह मिळाले आहे. या चिन्हावर आधारित प्रचारगीत शिवसेनेने प्रसिद्ध केले. त्यात ‘हिंदू हा तुझा धर्म, जाणून घे हेच मर्म’ अशी ओळ आहे. निवडणूक आयोगाने ‘हिंदू’ शब्द काढण्यास सांगितला आहे. याच गीतामध्ये ‘जय भवानी, जय शिवाजी’ या जयघोषातील भवानी शब्दावरही निवडणूक आयोगाचा आक्षेप आहे.
त्यावर ठाकरे यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन जोरदार तोफ डागली. मध्य प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा या राज्यांतील विधानसभा निवडणुकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘जय बजरंग बली बोला आणि बटण दाबा’ असे सांगितले होते. गृहमंत्री अमित शहा यांनीही मध्य प्रदेशमध्ये आयोध्येत रामलल्लाचे मोफत दर्शन हवे असेल तर भाजपला निवडून दया’ असे वक्तव्य जाहीर सभेत केले होते. आम्ही हिंदूंच्या नावाने मते मागितलेली नसतानाही भाजपचा नोकर असल्याप्रमाणे वर्तवणूक असलेल्या निवडणूक आयोगाने शब्द काढायला सांगणे, हा अन्याय आहे असे ठाकरे म्हणाले. आमच्यावर कारवाई करण्याअगोदर मोदी व शहा यांच्यावर आयोगाला कारवाई करावी लागेल, असे ठाकरे यांनी ठणकावले.
मोदी यांच्याकडून बजरंगबलीची घोषणा आणि शहा यांच्याकडून रामलल्लाच्या दर्शनाचे आमिष दाखविल्यावरून ठाकरे गटाने निवडणूक आयोगाला पत्र पाठविले होते. देवदेवतांच्या नावे मत मागण्याची मुभा पंतप्रधान व गृहमंत्र्यांना देण्यात आली आहे का? तसे असल्यास आम्हीही देवदेवतांच्या नावे मत मागू, असे या पत्रात म्हटले होते. मात्र निवडणूक आयोगाने या पत्राला साधे उत्तरही दिले नसल्याचा दावा ठाकरे यांनी केला.