अमरावती/दै.मू.वृत्तसेवा
भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा हनुमान जयंतीच्या पर्वावर जिल्ह्यातील अंजनगाव तालुक्यात चौसाळा या गावात मंगळवारी रात्री हनुमान मंदिरात हनुमानाचे दर्शन घेण्यासाठी आल्या होत्या. यावेळी मंदिरातून दर्शन घेऊन नवनीत राणा बाहेर पडल्या असता, शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांमुळे त्या गोंधळून गेल्या. शेतकऱ्यांनी रात्री गावाबाहेरील फलक पहायला चला, म्हणत घोषणाबाजी केली. यावेळी चांगलाच गोंधळ होत असल्यामुळे नवनीत राणा यांना चक्क गावातून काढता पाय घ्यावा लागला.
खासदार नवनीत राणा चौसाळा गावातील मंदिरात दर्शन घेऊन परत जात असताना काही तरूण शेतकऱ्यांनी त्यांना घेराव घातला. मंदिरापासून थोड्या अंतरावर असलेले एक फलक पाहण्यासाठी आमच्याबरोबर चला, अशी मागणी या लोकांनी केली. मात्र रात्रीचे 12 वाजले असून मला अजूनही चार ते पाच गावांमध्ये जायचे असल्याचे सांगून नवनीत राणा यांनी त्या लोकांबरोबर जाण्यास नकार दिला.
नवनीत राणा या फलक पाहण्यासाठी येत नाहीत, हे पाहून शेतकऱ्यांनी नवनीत राणा यांना त्यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या विधानाची आठवण करून दिली. मोदींची हवा नसून या फुग्यात राहू नका, असे नवनीत राणा एकदम बरोबर बोलल्याचे शेतकरी म्हणाले. यावर नवनीत राणा चांगल्याच संतापल्या आणि मंदिर परिसरातून बाहेर जाऊ लागल्या.
नवनीत राणा माघारी फिरत असल्याचे पाहून गावातील शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. तुम्हाला मतदान करून आम्ही चूक केली. आम्ही तुम्हाला मागच्या वेळी मतदान करून निवडून आणलं. तुम्ही आमच्या कुठल्याही समस्या सोडवल्या नाहीत. तुम्हाला मत मागण्याचा देखील अधिकार नाही, यावेळी मोदींना घरी पाठविणार. असे खडे बोल शेतकर्यांनी नवणीत राणा यांना सुनावले. या प्रकारामुळे चांगलाच गदारोळ झाला आणि नवनीत राणा आपल्या गाडीत बसून थोड्या पुढे गेल्या.
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल रोजी अमरावती लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. भाजपकडून नवनीत राणा, तर काँग्रेसकडून बळवंत वानखेडे रणांगणात आहे. तसंच, बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाचे दिनेश बूब हेही उमेदवार आहेत. त्यामुळे एकप्रकारे तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.