नवी दिल्ली/दै.मू.वृत्तसेवा
बांसवाडा येथील प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की जर काँग्रेस सरकार सत्तेत आलं तर ते लोकांच्या मालमत्ता घेऊन जास्त मुलं असणाऱ्यांना आणि घुसखोरांना देतील. जेव्हा त्यांचं सरकार होतं तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की, देशाच्या संपत्तीवर पहिला हक्क मुस्लिमांचा आहे. याचा अर्थ ते संपत्तीचं एकत्रिकरण करुन वाटून टाकतील. तुमच्या मेहनतीचा पैसा घुसखोरांना देतील.
पंतप्रधान पुढे म्हणाले होते की, काँग्रेसचा जाहीरनामा सांगतोय की ते आया-बहिणींच्या सोन्याचा हिशोब करतील, त्याची माहिती एकत्रित करतील आणि तेही वाटून टाकतील. मनमोहन सिंहांच्या सरकारने म्हटलं होतं की, संपत्तीवर पहिला अधिकार मुस्लिमांचा आहे. त्यामुळे ते त्यांनाच तुमची मालमत्ता वाटून टाकतील. ते महिलांचं मंगळसूत्रही ठेवणार नाही. त्यांच्या या विधानावर विराधी पक्षांकडून सडकून टीका केली जात आहे
सपाचे अध्यक्ष आणि यूपीचे माजी मुख्यमंत्रीअखिलेश यादव यांनी पंतप्रधानांसह योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे. यादव म्हणाले की, हे लोक मंगळसूत्राच्या गोष्टी करत आहेत. परंतु मोदीजींना आणि योगीजींना मंगळसूत्राचं काय देणं-घेणं? ज्यांचं लग्न झालं आहे ते मंगळसूत्राचं महत्त्व ओळखतात. भाजपच्या लोकांनी युवकांना नोकऱ्या दिल्या तरी बरं होईल कारण त्यांची लग्न होतील. ज्यांचं लग्नच झालं नाही त्यांच्यापुढे मंगळसूत्राच्या गोष्टी कशाला करता? असा सवाल अखिलेश यादव यांनी उपस्थित केला.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राऊत म्हणाले कि जो व्यक्ती स्वतःच्या घरातील मंगळसूत्राची प्रतिष्ठा राखू शकत नाही, त्याने दुसऱ्याच्या मंगळसूत्रावर पंचाईत करण्याची गरज नाही. प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, मोदींच्या राज्यात काँग्रेसच्या नव्हे तर महिलांचे मंगळसूत्र गहाण ठेवून लुटले गेले. मोदींनी आणलेल्या नोटाबंदीमुळे लाखो महिलांना मंगळसूत्र गहाण ठेवून घर चालवावे लागले. लॉकडाऊनमुळे हजारो, लाखो नोकऱ्या गेल्या. त्यावेळी महिलांना मंगळसूत्र विकून संसार चालवावा लागत होता. मणिपूरमध्ये किती महिलांचे मंगळसूत्र हिसकावले? जंतरमंतर येथे महिला खेळाडूंच्या मंगळसूत्रावर हात ठेवण्यात आला. मोदींना हे आठवत नाही का? या सगळ्याला मोदीच जबाबदार असून मोदींमुळेच देशात महिलांच्या मंगळसूत्रावर भीषण संकट आले आहे, असे संजय राऊत म्हणाले.
देशात काँग्रेसची सत्ता आली तर तुमच्या वाट्याची संपत्ती, हिंदू महिलांच्या गळ्यातलं मंगळसूत्रं जास्त मुलांना जन्म घालणाऱ्यांना दिली जातील असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात. मात्र मंगळसूत्राचं महत्त्व मोदींना कधीपासून कळायला लागलं? असा खोचक प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.
अखिलेश यादव यांच्या पत्नी आणि मैनपुरी येथील उमेदवार डिंपल यादव यांनी सत्ताधारी भाजपवर बोचरी टीका केली. त्यांनी पुलवामा घटनेचा दाखला देत भारतीय जवानांच्या पत्नीचे मंगळसूत्र कोणी हिसकावून घेतले? असा खोचक सवाल विचारला. पुलवामा येथे झालेली दुर्घटना कशी झाली याबद्दल सरकार भाष्य करण्यास तयार नसल्याचे डिंपल यांनी सांगितले.
त्या बुधवारी समाजवादी पार्टीचे उमेदवार अन्नू टंडन यांचा अर्ज भरण्यासाठी आल्या होत्या. यावेळी बोलताना त्यांनी सपाला मतदान करण्याचे आवाहन करत भाजपवर जोरदार निशाणा साधला. भाजप सरकारने तरूणांची नोकरी आणि रोजगार हिरावला आहे. आज संपूर्ण देश लोकशाहीची लढाई लढत आहे. ईडीच्या माध्यमातून प्रत्येक वर्गातील लोकांना त्रास दिला जात असून, खच्चीकरण केले जात आहे. उद्योगपती असो की मग नेता प्रत्येकाला ईडीची भीती दाखवली जात आहे. आज मागासवर्गीय, अनु.जाती आणि अल्पसंख्याक कोणत्याच वर्गातील लोकांना सन्मान मिळत आहे. देशातील सर्व पैसा ठराविक लोकांच्या खिशात जात आहे, असेही डिंपल यादव यांनी नमूद केले.