मुंबई/दै.मू.वृत्तसेवा
महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी दावा केला कि हेमंत करकरे यांचा मृत्यू दहशतवादी कसाबच्या गोळीने नाही तर संघाशी संबंधित असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याच्या गोळीने झाला, त्यांच्या या विधानाने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी देखिल मोठा दावा केला आहे. आरएसएस आणि करकरे यांच्यात संघर्ष सुरू होता, मात्र दहशतवादी हल्ल्यात करकरे यांचा मृत्यू झाला आहे, असे त्यांनी म्हटले आहे. ते सोमवारी पत्रकार परिषदेत बोलत होते.
हेमंत करकरे शहीद झाले आहेत. हेमंत करकरे देशासाठी लढले. कसाब आणि त्याचे साथिदार मुंबईत घुसले तेव्हा, हेमंत करकरे त्यांच्यासोबत लढले होते. कसाबच्या गोळीने किंवा इतर दहशतवाद्याच्या गोळीने त्यांचा मृत्यू झाला हे मला माहित नाही, पण हेमंत करकरे त्यावेळी घटनास्थळी होते. हेमंत करकरे एटीएसचे प्रमुख होते. मुंबईवर जेव्हा दहशतवादी हल्ला झाला तेव्हा हेमंत करकरे आपल्या टीमसोबत घटनास्थळी गेले आणि ते शहीद झाले.
काही लोकांनी त्यावेळी प्रश्न उपस्थित केला होता की हेमंत करकरे यांचं शहीद होणं रहस्यमय आहे, पण हे मी मानत नाही. त्याठिकाणी आणखी पोलीस अधिकारी शहीद झाले. अशोक कामठेंसह तुकाराम ओंबळे, करकरे शहीद झाले. त्यावेळी सर्वात मोठे युद्ध देशाच्या शत्रूबरोबर झालं होतं. असे असतानाही हेमंत करकरे यांचं नाव आता पुढे आलं आहे, पण विजय वडेट्टीवार यांनी हे वक्तव्य पहिल्यांदा केलं नाही. यासंदर्भता मी दोन गोष्टी तुमच्यासमोर ठेवतो, असे म्हणत संजय राऊत यांनी खुलासा केला.
संजय राऊत म्हणाले की, आरएसएस आणि हेमंत करकरे यांच्यात संघर्ष सुरू होता. त्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतर चर्चा झाल्या. एटीएसने त्यावेळी साध्वी प्रज्ञा आणि कर्नल पुरोहित यांना दहशतवादी कटकारस्थान रचल्याप्रकरणी अटक केली होती. रमेश उपाध्याय यांनाही अटक केली होती. त्या केसचा अभ्यास मी केला आहे. त्यावेळी आरएसएसचे लोक माझ्याकडे यायचे, करकरेंनी चुकीच्या पद्धतीने कारवाई केली आहे असं सांगायचे. कर्नल पुरोहित यांचे कुटुंबीय माझ्याकडे यायचे. आरएसएस आणि करकरेंचा संघर्ष सुरु होता. दुसरी गोष्ट की विजय वडेट्टीवार यांचं नाव का घेता? हू किल्ड करकरे हे पुस्तक वाचा, ते हसन मुश्रीफ यांचे भाऊ एस एम मुश्रीफ यांनी लिहिलं आहे. त्यामुळे हा प्रश्न विचारायचा असेल तर मुश्रीफ यांना विचारा. कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा हे आरएसएसचे लाडके होते. त्यांना अटक झाल्याने संघ आणि हेमंत करकरेंमध्ये संघर्ष सुरु होता. असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.