अलिबाग/दै.मू.वृत्तसेवा
गोरगरिबांची सोय व्हावी म्हणून स्वस्त धान्य दुकानावर त्यांना सरकारकडून मोफत धान्य उपलब्ध करून दिले जाते. मात्र हे अन्नधान्य सरकारी नोकरदारांनीच लाटल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. रायगड जिल्ह्यात 1656 सरकारी नोकर शिधा वाटप केंद्रांवर, मोफत धान्याची उचलत असल्याची बाब उघडकीस आली आहे. यांनतर सर्वांचा धान्यपुरवठा आता थांबविण्यात आला असून मोफत धान्य उचल करणाऱ्या सरकारी बाबूंच्या विरोधात चौकशीचा ससेमिरा सुरू झाला आहे.
पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत अंत्योदय कुटूंबाना दरमहा 35 किलो तर, प्राधान्य कुटूंबांना प्रति व्यक्ती पाच किलो धान्य वितरण सध्या केले जात आहे. मात्र या मोफत धान्य योजनेचा लाभ घेण्याचा मोह सरकारी बाबू लोकांनाही आवरता आलेला नाही. जिल्ह्यातील 1 हजार 656 नोकरदारांनी या योजनेचा लाभ घेतला. यांनतर त्यांचा धान्य पुरवठा बंद केला असून त्यांची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या चौकशी समितीच्या अहवालानंतर कर्मचाऱ्यांकडून वसुली केली जाणार आहे.
आधार कार्ड आणि मोबाइल क्रमांक लिंकिंग केल्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांची नावे पुढे आली आहेत. यातूनच मोफत धान्य किती कर्मचाऱ्यांनी उचलले हे देखील आता समोर आले आहे. आता किती वर्षांपासून हे कर्मचारी मोफत रेशन उचलत आहेत, याबाबतची चौकशी सुरू करण्यात आली आहे. रेशनवर मोफत धान्याची उचल करणारे हे कर्मचारी कधीपासून सेवेत आहेत. धान्याचा उचल कधीपासून केला याची माहिती घेतली जाणार आहे. यानंतर कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित होण्याची शक्यता आहे. या संदर्भात वरिष्ठ कार्यालयातून सूचना येणार आहेत. त्यानुसार कारवाई होणार आहे.
या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एका समितीच्या स्थापना केली आहे. त्यांचा अहवाल येत्या काही दिवसांत प्राप्त होईल. यानंतर जबाबदारी निश्चित करून योग्य कारवाई केली जाईल. सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना शुभ्र कार्ड मिळावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे रायगढचे जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनवणे म्हणाले.