नागपूर/दै.मू.वृत्तसेवा
‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’मधील प्राध्यापिका आणि लेखिका अल्पा शहा यांनी त्यांच्या ‘दि इनकारसिरेशन’ या पुस्तकात भीमा-कोरेगाव प्रकरणात खळबळजनक केला आहे. भीमा-कोरेगाव प्रकरणात 16 मानवाधिकार कार्यकर्त्यांना गुंतवण्यासाठी हॅकर्सच्या मदतीने खोटे पुरावे पेरण्यात आले. असा दावा अल्पा शहा यांनी केला आहे. लोकसत्ताशी बोलताना अल्पा शहा म्हणाल्या, ‘या पुस्तकाचे लेखन करताना सायबर फॉरेन्सिक तज्ज्ञांशी संवाद साधला. त्यांच्या संशोधनाचा आधार पुस्तकातील संदर्भासाठी घेतला. भारतीय व अमेरिकेच्या संशोधकांचा पुरावे पेरल्याचा दावा आहे.’
16 मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या संगणकात कृत्रिम पुरावे पेरण्यात आले. दंगलीत सक्रिय सहभाग नसतानाही त्यांना आरोपी करण्यात आले. ‘ट्रोजन हॉर्स’सारख्या सॉफ्टवेअरचा वापर करून हॅकर्सनी हे पुरावे पेरले. पुणे पोलिसांनी हॅकर्सच्या मदतीने हे कृत्य केले असण्याची शक्यता आहे. न्यायिक चौकशी केल्यावर या प्रकरणातील अनेक गुपिते उघड होऊ शकतात. मात्र सायबरतज्ज्ञांशी बोलल्यावर या प्रकरणात शासन कुठेना कुठे सहभागी आहे, हे स्पष्टपणे समोर येते, असे अल्पा शहा म्हणाल्या. जगभरात न्याय आणि समानतेसाठी लढणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने भीमा-कोरेगाव प्रकरणातून धडा घेण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
हॅकर्सच्या मदतीने 16 मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या संगणकात कृत्रिम पुरावे पेरून त्यांना आरोपी करण्यात आले, असा दावा अल्पा शहा यांनी पुस्तकात केला आहे. अल्पा शहा या ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’मध्ये मानववंशशास्त्र विषयाच्या प्राध्यापक आहेत. पुस्तकासाठी संशोधन करताना एखाद्या ‘थरारक’ चित्रपटाप्रमाणे पुरावे समोर येत गेले. या प्रकरणात आरोपींच्या संगणकातून पुरावे मिळविल्याचा दावा पुणे पोलिसांनी केला. मात्र हॅकर्सनी ई-मेलच्या माध्यमातून संगणकात शिरकाव करून त्याचा ताबा घेतला आणि पुरावे पेरले, असा दावा करीत या प्रकाराला ‘सायबर युद्धा’ची संज्ञा लेखिकेने दिली. भारतातील लोकशाही कसी ढासळतेय हे भीमा-कोरेगाव प्रकरणातून जगासमोर आले, अशी टिप्पणीही अल्पा शहा यांनी केली.
यापूर्वी सन 2022 च्या जून महिन्यात यूएस स्थित एका सायबर सुरक्षा कंपनीने दावा केला होता की पुणे पोलिसांनी रोना विल्सन, वरावरा राव आणि हॅनी बाबू या कार्यकर्त्यांच्या मालकीची इलेक्ट्रॉनिक उपकरणे हॅक केली आणि त्यावर बनावट पुरावे लावले, असे अमेरिकेतील वायर्ड मासिकाने वृत्त दिले होते.
विल्सन, राव आणि बाबू यांच्यावर 2018 मध्ये भीमा कोरेगावात जातीय हिंसाचार घडवण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. या लोकांना अटक करणाऱ्या व्यक्ती आणि ज्यांनी पुरावे लावले त्यांच्यात एक सिद्ध संबंध आहे,’ असे सायबर सिक्युरिटी फर्म सेंटिनेल वनचे सुरक्षा संशोधक जुआन अँड्रेस गुरेरो-साडे यांनी वायर्डला सांगितले होते.