पटियाला/दै.मू.वृत्तसेवा
भाजप उमेदवार प्रनीत कौर पटियाला येथील सेहरा गावात प्रचारासाठी आली असता या दरम्यान झालेल्या विरोध प्रदर्शनात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. सुरिंदरपाल सिंग असे मृताचे नाव आहे. या घटनेमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
प्राप्त माहितीनुसार, सिहरा गावात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. प्रनीत कौर प्रचारासाठी गावात आल्याची माहिती मिळताच मोठ्या संख्येने शेतकरी तेथे पोहोचले. शेतकऱ्यांनी प्रनीत यांच्या ताफ्याला घेराव घातला आणि घोषणाबाजी सुरू केली. यावेळी शेतकर्यांना काढण्यासाठी झालेल्या झटापटीत शेतकरी सुरिंदरपाल सिंग जमिनीवर बेशुद्ध पडले. त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तेथे त्यांचा मृत्यू झाला.
दुसरीकडे, भाजपा उमेदवार परनीत कौर यांच्या टीमनेही एक व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओमध्ये शेतकरी आंदोलनादरम्यान जमिनीवर पडताना दिसत आहे. शेतकऱ्यांनी परनीत कौर यांच्याविरोधात काळे झेंडे दाखवून निदर्शने करत त्यांची गाडी अडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस शेतकऱ्यांना गाडी अडवू नका, अशी विनंती करत होते. भाजपाच्या उमेदवार परनीत कौर यांनी शेतकऱ्याच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे.
याचबरोबर, मृत शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई आणि सरकारी नोकरी देण्याची मागणी शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल यांनी केली आहे. यासोबतच याप्रकरणी एफआयआर नोंदवण्याची मागणीही त्यांनी केली. जोपर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार केले जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
घटनास्थळी पोहोचलेले शेतकरी नेते सर्वन सिंग पंधेर यांनी ही हत्या असल्याचे सांगत कठोर कारवाईची मागणी केली आहे. पंढेर म्हणाले की, संयुक्त किसान मोर्चा आणि किसान-मजूर संघर्ष मोर्चाच्या शेतकरी नेत्यांना पाचारण करण्यात आले आहे. याबाबतची पुढील रणनीती लवकरच बैठकीत जाहीर करण्यात येणार आहे.
पटियाला येथील अकाली दलाचे उमेदवार एन.के. शर्मा यांनी प्रणीत कौर यांच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या हाणामारीत एका शेतकऱ्याचा मृत्यू होणे ही अत्यंत दुःखद घटना असल्याचे म्हटले आहे. ते पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांना दिल्लीत जाण्यापासून रोखले जात आहे. लोकशाहीत आंदोलन करणे हा शेतकऱ्यांचा मूलभूत अधिकार आहे. असेही ते म्हणाले. विशेष म्हणजे भाजपच्या उमेदवार प्रनीत कौर यांना शेतकऱ्यांकडून सातत्याने विरोध केला जात आहे. सामना, नाभा, राजपुरा आणि बहादूरगडमध्ये शेतकऱ्यांनी प्रनीत कौर यांना घेराव घातला आणि घोषणाबाजी केली.