बारामती/दै.मू.वृत्तसेवा
बारामती लोकसभा मतदार संघात दोन दिवसांवर मतदान आले आहे. मात्र अजूनपर्यंत एकाही उमेदवाराने व त्यांच्या पक्ष प्रमुखाने मनोज जरांगे यांच्या मागणीप्रमाणे मराठा आरक्षणाबाबत कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे मराठा समाजामध्ये तीव्र नाराजी असून आता मराठा क्रांती मोर्चा बारामतीच्या वतीने बारामती लोकसभा मतदार संघातील उमेदवारांना मराठा आरक्षणाविषयी भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अन्यथा मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या सूचनेनुसार योग्य तो निर्णय घेईल,असा इशारा देण्यात आला आहे.
राज्य सरकारने मराठा समाजाला 10 टक्के एसईबीसी आरक्षण लागू केले आहे. यामुळे आरक्षणाची 50 टक्केची सीमा ओलांडली गेली. सुप्रीम कोर्टाने यापूर्वीचे एसईबीसी आरक्षण रद्द करताना 50 टक्केची मर्यादा ओलांडल्या मुद्दा अधोरेखीत केला होता. यामुळे नवीन मराठा आरक्षण न्यायालयात टिकेल कि नाही, याविषयी समाजबांधवाना सांशकता आहे.
पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ते सत्तेत आल्यास 50 टक्के आरक्षणाची मर्यादा रद्द करू असे वक्तव्य केले आहे. हा धागा पकडत विनोद पाटील यांनी नमूद केले की राहुल गांधींच्या विधानाचे आपण स्वागत करतो. मात्र त्यांचे हे विधान चुनावी जुमला असू नये. यासोबतच महाराष्ट्रात निवडणूक लढविणाऱ्या सर्वच राजकीय पक्षांनी मराठा आरक्षणासंदर्भात 50 टक्कयांची मर्यादेवर भूमिका जाहिर करावी, अशी मागणीही मराठा आरक्षण याचिकाकर्ते निवोद पाटील यांनी केली.
लोकसभा निवडणुकीत मराठा समाजानं कोणालाही पाठिंबा दिलेला नाही किंवा आपला उमेदवारही दिला नाही. ही निवडणूक मराठा समाजाच्या हातात सोपवली आहे. मराठा समाजाला सगेसोयरे कायद्याच्या बाजूने कोण होते, आणि विरोधक कोण होते? हे माहिती आहे. त्यामुळे या निवडणुकीत जे सगेसोयरे कायद्याच्या बाजूने आहेत, त्यांना मराठा समाज सहकार्य करेल आणि मराठाद्वेषी आणि सगेसोयरे कायद्याला विरोध करणार्यांना या निवडणुकीत पाडल्याशिवाय मराठे स्वस्थ बसणार नाहीत, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी यापूर्वी दिली आहे.मराठा क्रांती मोर्चा काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.