सोलापूर/दै.मू.वृत्तसेवा
मराठा आरक्षणावरून सोलापुरात मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. मराठ्यांचा छळ करणारे फडणवीस जोपर्यंत भाजपमध्ये आहेत, तोपर्यंत भाजपा आणि त्यांच्या मित्र पक्षाला मत देणार नाही, अशी सामूहिक शपथ उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी गावातील नागरिकांनी घेतली आहे. कोंडी गावात छत्रपती शिवाजी महाराजांना साक्ष ठेवून मराठा बांधवानी शपथ घेत भाजपला मदत न करण्याचा निर्धार केला.
कोंडी ग्रामस्थ भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आक्रमक झाले आहेत. मराठा समाजाच्या वतीने भाजप आणि देवेंद्र फडणीवीसांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात येत आहे. यावेळी सामूहिक शपथ घेण्यात आली आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने शपथ घेतली आहे. भाजप, देवेंद्र फडणवीस किंवा त्यांच्या मित्रपक्षाला आम्ही वोट देणार नाही, अशी शपथ घेतली आहे. त्यामुळे भाजपच्या कोणत्याही उमेदवाराने कोंडी गावामध्ये पाऊल ठेवताना दहावेळा विचार करावा, असा इशारा कोंडी ग्रामस्थांनी दिला आहे.
सरकारने दिलेले आरक्षण हे कोर्टात टिकणारे नसून, मराठा समाजाची फसवणूक झाल्याचा आरोप मराठा समाजाने केला. त्यामुळे यापुढे भाजपच्या उमेदवाराला मतदान करणार नाही, अशी शपथ गावातल्या मराठा समाजाने घेतली आहे. 10 टक्के आरक्षणाची मागणी मराठा समाजाची नव्हती. आम्हाला 50 टक्के ओबीसी प्रवर्गातून आरक्षण हवं आहे. पण शासनाने दिलेलं आरक्षण न्यायालयात टिकणार नाही हे आम्हाला आणि सरकारलाही माहिती आहे. त्यामुळे याचे आम्हाला काही आश्चर्य नाही, असही मराठा समाजाने म्हटलं आहे.
या निर्णयाचा आम्हाला कुठलाही आनंद झाला नाही. निवडणुकीपूर्वी आमच्या तोंडासमोर हे गाजर धरलं. या भुलथापांना, खोट्या आश्वासनांना मराठा समाज बळी पडणार नाही. आमची एकच मागणी आहे की ओबीसी प्रवर्गातून आम्हाला आरक्षण हवं आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आतून विरोध करणारे, मराठा समाजाचा द्वेष करणारे देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे नेते भाजपमध्ये आहेत तोपर्यंत या पक्षाच्या उमेदवाराला अथवा यांच्या पक्षाशी युती करणाऱ्या पक्षाच्या उमेदवाराला आम्ही मतदान करणार नाही, अशी स्पष्ट भूमिका मराठा समाजाच्या लोकांनी घेतली आहे.
कोंडी गावात छत्रपती शिवाजी महाराजांना साक्ष ठेवून मराठा बांधवानी शपथ घेत भाजपला मदत न करण्याचा निर्धार केला. मराठ्यांना छळण्याचं काम फडणवीसांनी केलं असून आम्ही त्यांना त्यांची जागा दाखवणार आहे. कोणतीही निवडणूक असूदे प्रचाराची गाडी गावात आल्यास मदत करणार नाही, मराठा समाज भाजपला मदत करणार नाही, असे ग्रामस्थांनी म्हटले आहे.