रत्नागिरी/दै.मू.वृत्तसेवा
भाजपने रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून नारायण राणेंना लोकसभेची उमेदवारी दिली. या जागेवरून उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हेदेखील इच्छुक होते, पण अखेर नारायण राणे यांचं नाव निश्चित झालं. नारायण राणेंना उमेदवारी मिळाली असली तरी शि्ांदेंची शिवसेना आणि भाजप मनाने एकत्र आले नसल्याचे दिसून येत आहे. याचं कारण म्हणजे शिवसैनिकांनी अचानक नारायण राणेंचा प्रचार करणं थांबवलं आहे.
प्रचारासाठी छापून आलेल्या भाजपच्या पोस्टरवर बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे गायब असल्याने त्यांचा प्रचार करणार नाही, असा पवित्रा शिंदेंच्या शिवसेनेने घेतला आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी नारायण राणेंचा प्रचार थांबवल्याची माहिती समोर येत आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून महायुतीचे उमेदवार म्हणून नारायण राणे निवडणूक लढवत आहेत. आधीच या मतदारसंघात उमेदवार घोषित व्हायला वेळ लागला. रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून आपल्यालाच उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा शिवसैनिकांना होती, मात्र हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेल्यावर शिवसैनिकांमध्ये नाराजी पसरली. शिवसैनिकांत असलेली ही नाराजी दूर करण्याचे काम मंत्री उदय सामंत आणि किरण सामंत यांच्याकडून केले जात होते.
उदय सामंत आणि किरण सामंतांच्या प्रयत्नांना यश येत असतानाच उमेदवाराच्या प्रचार साहित्यावर बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा फोटो नसल्याने शिवसैनिक नाराज झाले आहेत. बाळासाहेब आणि आनंद दिघेंचा फोटो नसल्यामुळे शिवसैनिकांनी नारायण राणेंचा प्रचार थांबवला असल्याची माहिती मिळत आहे.
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या वतीने केंद्रीय मंत्री नारायण राणे उमेदवार आहेत. मात्र सिंधुदुर्गात भाजप आपल्याला विश्वासात घेऊन काम करत नसल्याचं शिंदे शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते सांगत आहेत. जो पर्यंत विश्वासात घेऊन काम करत नाही तोपर्यंत लोकसभेच काम करणार असल्याची शिंदे शिवसेनेने म्हटलं आहे.
रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने विद्यमान खासदार विनायक राऊत यांना उमेदवारी दिली आहे, त्यामुळे या मतदारसंघात नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत अशी लढत होणार आहे. या मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी मतदान होणार आहे. मात्र मतदानाला अवघे पंधरा दिवस बाकी असताना अजूनही शिंदे गट भाजप यांच्यात समन्वय बैठका सुरू असल्याने कार्यकर्त्यांमध्ये अजूनही संभ्रमाचं वातावरण असल्याचं दिसून येत आहे.