नवी दिल्ली/दै.मू.वृत्तसेवा
कपिल सिब्बल यांनी बुधवारी भाजपावरजोरदार हल्लाबोल केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपातलं इनकमिंग वाढलं आहे. 2014 ते 2024 दहा वर्षांच्या कालावधीत केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर असलेले विरोधी पक्षांमधले 25 दिग्गज नेते भाजपात गेले असून यातल्या 23 जणांना चौकशीच्या ससेमिऱ्यातून दिलासा मिळाला आहे, असा दावा नामी वकील आणि राज्यसभेचे खासदार कपिल सिब्बल यांनी केला आहे.
भाजपा हे ‘वॉशिंग मशिन’ बनले आहे, ज्यात भ्रष्ट नेत्यांचे डाग गेल्याबरोबर धुतले जातात, असा आरोप काँग्रेससह सर्वच विरोधी पक्ष सातत्याने करत आहेत. भाजपामध्ये गेल्यानंतर नेत्यांवर दाखल झालेले भ्रष्टाचाराचे गुन्हे बंद करण्यात येत असल्याचं विरोधकांचं म्हणणे आहे. अशातच कपिल सिब्बल यांनी एका बातमीचा आधार घेत एक्स वर ही बातमी शेअर केली. ‘विरोधकांविरुद्ध भाजपाची राजकीय चर्चाः कथित भ्रष्टाचार पण तरीही भ्रष्टाचाऱ्यांना मिठी मारा. 2014 पासून भ्रष्टाचाराच्या आरोपांना सामोरे जाणाऱ्या 25 नेते भाजपामध्ये सामिल झाले आणि 23 जणांना दिलासा मिळाला’ असं कपिल सिब्बल यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, 2014 पासून कथित भ्रष्टाचार प्रकरणात केंद्रीय संस्थांकडून कारवाईचा सामना करणारे 25 प्रमुख नेते भाजपामध्ये सामील झाले आहेत. या नेत्यांनी काँग्रेस, समाजवादी पक्ष असे पक्ष सोडले आहेत. यामध्ये सर्वाधिक 10 नेते काँग्रेसचे होते, ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल होते, मात्र नंतर ते भाजपामध्ये दाखल झाले. राष्ट्रवादी आणि शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर असून, त्यापैकी चार नेत्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. टीएमसीचे तीन, टीडीपीचे दोन आणि सपा आणि वायएसआरसीपीचा प्रत्येकी एक नेता भाजपामध्ये दाखल झाला.
भाजपामध्ये प्रवेश केल्याने 25 पैकी 23 नेत्यांना दिलासा मिळाला आहे. या 23 नेत्यांपैकी 3 विरुद्ध दाखल झालेले गुन्हे बंद करण्यात आले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या आधीच 25 नेत्यांपैकी 6 नेत्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर या नेत्यांवरील तपास यंत्रणांची कारवाई मंदावली आहे. 2014 मध्ये भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार स्थापन झाल्यानंतर ईडी आणि सीबीआयच्या कारवाईत वाढ झाल्याचा रिपोर्ट इंडियन एक्स्प्रेसमध्ये देण्यात आला आहे.
2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करत भाजपासह सरकार स्थापन केलं. याच्या एक वर्षांनंतर अजित पवार सत्तेत सहभागी झाले आणि नंतर अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्याविरोधात असलेली प्रकरणं शांत झाली. 25 जणांची जी यादी समोर आली आहे त्यातले 12 नेते हे महाराष्ट्रातले आहेत.
त्यावेळी अजित पवार महाविकास आघाडीत होते. भाजपा सत्तेत आल्यानंतर हे प्रकरण पुन्हा उघडण्याचा प्रयत्न झाला. ज्यानंतर अजित पवार यांनी एनडीएबरोबर जाणं पसंत केलं. त्यानंतर मार्च २०२४ हे प्रकरण थंड बस्त्यात गेलं. आता आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईच्या आधारे ईडीने केलेली कारवाई निष्प्रभ ठरली आहे.
अशाच प्रकरणात टीएमसीचे सुवेंदू अधिकारी आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, तसंच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावरच्या कारवायाही थंड बस्त्यात गेल्या आहेत. हिमंता बिस्वा सरमा यांच्यामागे शारदा चिट फंड स्कॅम प्रकरणात चौकशीचा ससेमिरा लागला होता. त्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला. आदर्श घोटाळा प्रकरणात अशोक चव्हाणांवर आरोप झाले, खटलाही उभा राहिला. मात्र अशोक चव्हाण भाजपात आल्यानंतर इतर सगळ्या गोष्टी शांत झाल्या.