नवी दिल्ली/दै.मू.वृत्तसेवा
मतदानाच्या पहिल्या दोन टप्प्यात कमी मतदान झाल्यानंतर भाजपची चिंता वाढली आहे. त्यामुळे आता पक्षाने मुस्लिमांना टारगेट करण्याची रणनीती आखण्यात आली आहे. यामुळेच पीएम मोदी म्हणाले होते कि काँग्रेस आघाडीची सत्ता आल्यास वारसा कर लादून हिंदूंची संपत्ती मुस्लीम समाजात वाटली जाईल, जवळपास प्रत्येक सभेतून त्यांनी ही टीका केली आहे. आता तेलंगणा येथे प्रचार सभेत बोलत असताना मुस्लीम समाजाबाबत आणखी एक विधान केले आहे. मी जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारावर आरक्षण मिळू देणार नाही. तेलंगणाच्या मेडक जिल्ह्यात प्रचारसभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे वक्तव्य केलं.
अब की बार, 370 पार, एनडीए के साथ 400 पार’ अशी घोषणा देणारा भाजप पहिल्या दोन टप्प्यात कमी झालेल्या मतदानामुळे चिंतेत आहे. पहिल्या टप्प्यात सहा टक्क्यांहून कमी, तर दुसऱ्या टप्प्यातही चार टक्क्यांहून कमी मतदान झाल्याचे सांगण्यात येत आहे. 2019 मध्ये जिंकलेल्या ३०३ जागांसाठी किमान 69 टक्के मतदान होणे आवश्यक आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला एकूण मतांपैकी 38 टक्के मते मिळाली होती. तिसऱ्या टप्प्यातील बहुतांश जागा भाजपने यापूर्वी जिंकल्या जागा आहेत. ही बाब लक्षात घेता भाजपने आपल्या रणनीतीत बदल करण्याची योजना आखली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यापुढील सभांमध्ये सब का साथ, सब का विकास’ यावर नाही, तर ते थेट मुस्लिमांवर टीका करणार आहेत. भाजपचे इतर स्टार प्रचारक देखील मुस्लिम तुष्टीकरणाच्या मुद्यावर विरोधी पक्ष काँग्रेस आणि इतर पक्षांवर थेट हल्ला करतील. काँग्रेस लोकांकडून त्यांची संपत्ती, सोने, चांदी, मंगळसूत्र हिसकावून घेऊन रोहिंग्यांना आणि घुसखोरांना देईल, असे पंतप्रधानही आपल्या भाषणात सतत सांगत आहेत.
मतदान वाढवण्यासाठी भाजपने आपली संघटना सक्रिय केली आहे. बूथ कमिटीच्या सदस्यांना घरोघरी मतदानाच्या चिठ्ठया वाटण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मतदारांना घराबाहेर काढून मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी स्वतंत्र तयारी करण्यात आली आहे. फ्लोटिंग व्होटरला आकर्षित करण्यासाठी भाजपने रणनीतीत बदल केला आहे.
भाजपाने या निवडणुकीत ४३२ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. अजूनही 10 जागांवर निर्णय बाकी आहे. भाजपाला 370 जागांचे बहुमत हवं असेल तर एकूण उमेदवारांपैकी 85 टक्के उमेदवार विजयी होणं गरजेचे आहे. परंतु सध्या भाजपाचं हे टार्गेट कठीण होत असल्याचं दिसून येत आहे. कारण सरकार आरक्षण संपवणार आहे असा प्रचार करण्यात विरोधी पक्ष यशस्वी झाला आहे. त्यात गृहमंत्री अमित शाह यांचा फेक व्हिडिओही व्हायरल झाला. मोदी सरकार आल्यास आरक्षण संपवणार असा प्रचार विरोधकांनी केला आहे. त्यामुळे हा मुद्दा भाजपासाठी डोकेदुखी बनला आहे.
मागील 15 दिवसांपासून देशात संविधान वाचवण्यासाठी हल्लाबोल सुरू आहे. भाजपाला 400 पार बहुमत देशातील संविधान बदलासाठी हवं आहे. जर ते पु्न्हा सत्तेत आले तर संविधान बदलतील असा प्रसार विरोधकांकडून केला जात आहे. ज्यारितीने ईडी-सीबीआयच्या माध्यमातून सरकार मनमानी करत आहे. विरोधी पक्षांवर दबाव तंत्र वापरून नेत्यांना जेलमध्ये टाकत आहे. त्यामुळे विरोधकांनी लोकशाही वाचवा असं आवाहन देशातील जनतेला केलं आहे.
नुकतच माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू प्रज्ज्वल रेवन्ना यांचे अनेक आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झालेत. त्यावरून गुन्हा दाखल झाला आहे. शेकडो महिलांसोबत रेवन्ना यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने देशभरात हा मुद्दा चर्चेत आहे. इंडिया आघाडीने या मुद्द्यावरून भाजपाला कोंडीत पकडलं आहे. त्यामुळे भाजपाचा अबकी बार 400 पार चा नारा आता उलटा पडला आहे. भाजपाच विजयी होणार यामुळे अनेक भाजपा मतदार मतदान केंद्रापर्यंतही पोहचत नसल्याचे दिसते. त्यामुळे अबकी बार 400 पारचा नारा भाजपाच्या अंगलट येत असल्याचं बोललं जात आहे.