मुंबई/दै.मू.वृत्तसेवा
बेताल वक्तव्य करून चर्चेत राहणारे भाजपचे आमदार नितेश यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. गोवंडी येथे जनआक्रोश मोर्चा दरम्यान नितेश राणेंनी दोन समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्य केल्या प्रकरणी मुंबईतील वकिलांनी व विधी विभागाच्या विद्यार्थ्यांनी देशाच्या सर न्यायाधीशांना पत्र लिहिले आहे. राणेंच्या द्वेश युक्त भाषणाची सर्वोच्च न्यायालयाने सुओमोटो दखल घ्यावी तसेच या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
गोवंडी येथे काही दिवसांपूर्वी जण आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात भाषण करताना भाजप आमदार नितेश राणे यांनी मुस्लिम समाजबाबत द्वेषयुक्त भाषण केले होते. मुस्लिमांची घरे, दुकाने आणि मशिदी पालिकेने जमीनदोस्त कराव्यात तसेच मुस्लिम हे हिरवे साप असल्याचे त्यांनी म्हटले होते. दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या राणे यांच्या प्रक्षोभक भाषणानंतर पोलिसांनी सुद्धा कोणतीही कारवाई न करता केवळ बघ्याची भूमिका घेतली.
आमदार राणे यांच्या भाषणामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या असून सर्वोच्च न्यायालयाने याची स्वतः हुन दखल घ्यावी म्हणुन गोवंडीतील वकिलांनी व विधी विभागाच्या विद्यार्थ्यांनी सरन्यायाधीशाना पत्र लिहिले आहे. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी तसेच या पत्राकडे न्यायालयाने याचिकेच्या स्वरूपात पाहावे असे त्यात नमूद करण्यात आले आहे.
दुसरीकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात बेताल वक्तव्य केल्या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे अखेर सोमवारी माझगाव न्यायालयात हजर झाले. अजामीनपात्र वॉरंट प्रकरणी अटक टळली असली तरी न्यायालयाने त्यांना 100 रुपायांचा दंड ठोठावत पुढील सुनावणीला हजर राहण्यास बजावले आहे.