पटना/दै.मू.वृत्तसेवा
देशभरात लोकसभा निवडणकीचे पडघम वाजत असून राजकीय नेत्यांमध्ये शब्दयुद्धही तीव्र झाले आहे. अशातच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जमुईच्या निवडणूक सभेत लालू- राबडी राजवटीच्या कालखंडावर उपस्थित केलेल्या प्रश्नांना आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यांनी शुक्रवारी जोरदार पलटवार केला. कवितेच्या माध्यमातून हल्लाबोल करताना त्यांनी मोदी सरकार खोट्याच्या आधारावर उभे असल्याचे म्हटले आहे. मोदींनी खोटेपणाचा बुरखा सर्वत्र पसरवला आहे. जनतेने हे खोटे ओळखले आहे आणि त्याचे उत्तर या निवडणुकीत देईल, असे लालू प्रसाद यादव यांनी म्हटले आहे.
आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करत त्यांनी निशाणा साधला आहे. खोटी आश्वासनं दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. “झूठ का अंबार- मोदी सरकार, झूठ का दरबार- मोदी सरकार“ असं म्हणत लालू प्रसाद यादव यांनी खोचक टीका केली आहे. नोकऱ्यांवर खोटं, इतिहासावर खोटं, विकासावर खोटं, आश्वासनांमध्ये खोटं, प्रत्येक गोष्टीत खोटं, प्रत्येक विचारात खोटं, येथे खोटं, तेथे खोटं, उजवीकडे खोटं, डावीकडे खोटं, घराणेशाहीवर खोटं. इतकं खोटं कोण बोलतं? जनतेने मोदी सरकारचं खोटं पुसून टाकायचं ठरवलं आहे“ असं ट्विट करत लालू प्रसाद यादव यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
केंद्र सरकार जनतेला कशी खोटी आश्वासने देत आहे, याचा उल्लेख लालूप्रसाद यादव यांनी आपल्या कवितेतून केला आहे. निवडणुकीच्या सभा सुरू होताच शब्दयुद्धही तीव्र झाले आहे. गुरुवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बिहारच्या जमुईमध्ये निवडणूक रॅलीला संबोधित करण्यासाठी आले होते. सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालू राबरी राजवटीवर जोरदार निशाणा साधला. रॅलीच्या माध्यमातून त्यांनी 90 च्या दशकात बिहारमध्ये कोणत्या प्रकारची अराजकता होती हे सांगण्याचा प्रयत्न केला.
दुसरीकेडे प्रसिद्ध निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधताना बिहारच्या परिस्थितीत फारसा फरक पडलेला नसल्याचे म्हटले आहे. जर लालू प्रसाद यांची राजवट ’गुन्हेगारांचे जंगलराज’ असेल तर नितीश कुमार यांची राजवट ’अधिकाऱ्यांचे जंगलराज’ आहे. असेही ते म्हणाले. लोक नितीश कुमार आणि त्यांच्या राजवटीच्या विरोधात अपशब्द वापरत आहेत. सुरक्षा आणि सरकारी कर्मचाऱ्यांशिवाय नितीशकुमार बिहारच्या कोणत्याही गावात फिरू शकत नाहीत. आज बिहारमध्ये नोकरशाही आणि भ्रष्टाचार शिगेला पोहोचला आहे. पैशाशिवाय एकही काम होत नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे.
ते म्हणाले की, ज्या गावांना भेट देण्याची संधी मिळाली आहे तेथे स्थलांतराची समस्या खूप मोठी आहे. 60 टक्के गावांमध्ये तरुण नाहीत. बिहारमधील शिक्षण व्यवस्था कोलमडणे हे नितीश कुमार यांच्या राजवटीचे सर्वात मोठे अपयश आहे. प्रशांत किशोर म्हणाले की बिहारमधील गरिबी आणि बेरोजगारीचे सर्वात मोठे कारण म्हणजे भूमिहीन लोकांची संख्या मोठी आहे.