इंदापुर/दै.मू.वृत्तसेवा
लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार हे भाजपा, केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना दिसत आहेत. झारखंड आणि दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली म्हणून त्यांना तुरुंगात टाकण्यात आले. पश्चिम बंगालचे तीन मंत्री तुरुंगात आहेत. सत्ता डोक्यात गेली की देशाची लोकशाही उद्ध्वस्त होते. सत्तेचा गैरवापर करणाऱ्या मोदींना त्यांची जागा दाखविण्याची वेळ आली आहे, अशी सडकून टीका शरद पवार यांनी मंगळवारी केली. दौंड येथील शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.
पवार म्हणाले कि 2014 ला मोदी यांनी राज्य हातात घेतले आणि तेव्हा त्यांनी जाहीर केले, 50 दिवसांच्या आत पेट्रोलचा भाव मी 50 टक्के कमी करतो. त्यांची घोषणा होऊन 3 हजार 650 दिवस झाले. त्याचा हिशोब केला. 2014 ला 71 रुपये लिटर भाव होता, 50 टक्के कमी करतो म्हटले म्हणजे 35 रुपये किमान व्हायला हवा होता. पण आता तो भाव 100 ते 106 रुपये आहे. याचा अर्थ एकच आहे शब्द दिला एक आणि केले दुसरे. अशे म्हणत पवार यांनी मोदी गॅरंटीची हवाच काढून टाकली.
मोदींनी सत्तेत येण्यापूर्वी दर वर्षी 2 कोटी युवकांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र यात मोदी अपयशी ठरले आहेत. या फसव्या लोकांना येणाऱ्या निवडणुकीत त्यांची जागा दाखवावी लागेल,’ असा इशारा पवार यांनी दिला. सत्ता द्या देशातील भ्रष्टाचार संपवतो, असे नरेंद्र मोदींनी सांगितले होते. नोटबंदीमुळे काळा पैसा संपेल, असेही सांगितले होते. पंधरा लाख सोडा पंधरा रुपयेही लोकांच्या खात्यात आले नाहीत. भ्रष्टाचार करणाऱ्यांना भाजपने पक्षात घेतले आहे. मोदी सरकार भ्रष्टाचाऱ्यांना स्वच्छ करण्याचे मशीन आहे, असा हल्लाबोल शरद पवार यांनी केला.
आया बहिणी आमचे घर सांभाळतात. त्यांना गॅस लागतो. मध्यंतरी सर्वत्र जाहिराती होत्या, गॅसचे भाव कमी केले. 2014 ला घरगुती गॅसच्या एका सिलेंडरचा दर 410 रुपये होता, आज 1 हजार 160 आहे. भाव कमी झाला? असा थेट सवाल शरद पवारांनी केला. गेल्यावेळी आघाडी नव्हती आता आघाडी आहे. एक एक जागा निवडून आणण्यासाठी इंडिया आघाडी काम करत आहे. मोदींची एक एक जागा कमी करणे, मोदींची संसदेतील संख्या कमी करणे, त्यांची शक्ती कमी करणे ही देशाची गरज आहे, असे शरद पवार म्हणाले होते.