नवी दिल्ली/दै.मू.वृत्तसेवा
पंजाबमध्ये आपला प्रभाव वाढविण्यासाठी शीख गुरुद्वारा मॅनेजमेंट कमिटीच्या आजी माजी नेत्यांना भाजपामध्ये प्रवेश दिला जात आहे. यावरून गुरुद्वारा व्यवस्थापनावर देखरेख करणाऱ्या शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भाजपने शिखांच्या धार्मिक घडामोडींमध्ये हस्तक्षेप करू नये, शीख समुदाय तो अजिबात सहन करणार नाही, असा इशारा एसजीपीसीचे प्रमुख हरजिंदर सिंग धामी यांनी गेल्या शनिवारी दिला आहे. तसेच भाजपामध्ये प्रवेश केलेल्या दिल्ली शीख गुरुद्वारा मॅनेजमेंट कमिटीच्या विद्यमान सदस्यांनी आपापल्या पदाचा राजीनामा द्यायला हवा, असेही त्यांनी म्हटले आहे.
एक हजारहून अधिक शीख नेत्यांनी गेल्या शनिवारी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. त्यामध्ये दिल्ली शीख गुरुद्वारा मॅनेजमेंट कमिटीच्या सहा आजी आणि एका माजी सदस्याचाही समावेश आहे. या साऱ्या घटनाक्रमानंतर गुरुद्वारा व्यवस्थापनावर देखरेख करणाऱ्या शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटीकडून आक्षेप घेण्यात आला आहे.
शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटीने याबाबत असे म्हटले आहे की, भाजपा शिखांच्या धार्मिक घडामोडींमध्ये हस्तक्षेप निर्माण करीत आहे. त्यामुळे भाजपामध्ये प्रवेश केलेल्या दिल्ली शीख गुरुद्वारा मॅनेजमेंट कमिटीच्या विद्यमान सदस्यांनी आपापल्या पदाचा राजीनामा द्यायला हवा. एसजीपीसीचे प्रमुख हरजिंदर सिंग धामी यांनी गेल्या शनिवारी असे म्हटले आहे, भाजपाला शिखांच्या धार्मिक घडामोडींमध्ये हस्तक्षेप करायचा आहे; मात्र शीख समुदाय तो अजिबात सहन करणार नाही.
पुढे धामी असे म्हणाले, धार्मिक भावना आणि परंपरांचा आदर करतील, असा विश्वास ठेवूनच शीख समुदायाकडून या सदस्यांची मॅनेजमेंट कमिटीवर निवड केली जाते. मात्र, जेव्हा हे सदस्य शीखविरोधी विचारधारा असलेल्या पक्षामध्ये प्रवेश करतात, तेव्हा शीख समाजाच्या भावना दुखावल्या जाणे स्वाभाविकच आहे.
सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपला प्रभाव निर्माण करण्यासाठीच इतक्या मोठ्या प्रमाणावर शीख नेत्यांना भाजपामध्ये प्रवेश दिला असला तरी या निवडणुकीमध्ये पंजाब आणि हरयाणा राज्यातील शेतकऱ्यांनी कृषी कायद्यांवरून केलेल्या आंदोलनाचा फटका भाजपाला बसण्याची शक्यता अधिक आहे. त्या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या काळातील हा रोष थोडा कमी व्हावा म्हणून शीख समुदायाला आपलेसे करण्याचा प्रयत्न भाजपाकडून केल जात आहे. एकेकाळी दीर्घकाळ युतीत असलेले शिअद आणि भाजपा सध्या मित्रपक्ष नाहीत. त्याचाही फटका भाजपाला पंजाबमध्ये बसण्याची शक्यता आहे.
शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांनीही मंगळवारी मॅनेजमेंट कमिटीतील सदस्यांच्या भाजपा पक्षप्रवेशावर टीका केली आहे. ते म्हणाले, दिल्ली, हरयाणा वा तख्त साहिबानमधील शीख गुरुद्वारा मॅनेजमेंट कमिटीमध्ये अधिकाधिक हस्तक्षेप निर्माण करण्याचा प्रयत्न करून भाजपा शिखांच्या धार्मिक संस्थांना कमकुवत करण्याचा प्रयत्न करीत आहे. या पक्षाकडून ज्या क्लृप्त्या वापरल्या जात आहेत, त्या शीख समुदायाच्या लक्षात येत आहेत. या निवडणुकीत शीख समुदायातील लोक भाजपाला नाकारतील, अशी मला खात्री आहे.
गेल्या फेब्रुवारीमध्ये शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांनी महाराष्ट्र सरकारवरही आगपाखड केली होती. कारण महाराष्ट्र सरकारने श्री हुजूर साहिब मॅनेजमेंट बोर्डाची स्थापना केली होती. स्वातंत्र्यानंतर शीख समुदायाला काही वचने देण्यात आली होती. त्या वचनांपैकी एक वचन म्हणजे एसजीपीसीच्या दोन-तृतीयांश बहुमताची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय केंद्र सरकार शिखांच्या धार्मिक बाबींमध्ये हस्तक्षेप करणार नाही. सुखबीर सिंग बादल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून या वचनाचीच आठवण करून दिली आहे.
डीएसजीएमसीचे अध्यक्ष परमजीत सिंग सारणा यांनी म्हटले कि पक्षामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर शीख नेत्यांना प्रवेश दिल्यामुळे भाजपाला कोणताही फायदा होणार नाही. जर अशी कृती करून आपण शीख समुदायाला आपलेसे करू शकू, असे त्यांना वाटत असेल, तर ते मोठी चूक करीत आहेत. पंजाबमधील मतदार जसे त्यांच्यावर संतापलेले आहेत; तसेच पंजाबबाहेरचे मतदारही संतापलेले आहेत.