नवी दिल्ली/दै.मू.वृत्तसेवा
पहिल्या टप्प्यात अपेक्षेपेक्षा कमी मतदान झाले, त्यामुळे भाजप आणि महायूतीचे नेते चिंतीत आहेत. आता दुसर्या टप्प्यातही कमी मतदान झाल्याने भाजप आणि महायूतीच्या नेत्यांची धाकधूक आणखी वाढली आहे. मतदानाची टक्केवारी वाढते तेव्हा ती प्रस्थापितांविरोधातील लाट असते आणि टक्केवारी घसरते तेव्हा सत्ताधार्यांना फटका बसतो, हे आजवरच्या लोकसभा निवडणुकीतील टक्केवारीवरून दिसून आले आहे. गेल्या बारा निवडणुकांपैकी पाचवेळा मतांची टक्केवारी घटली त्यापैकी चार वेळा केंद्रातील सरकार बदलले आहे. त्यामुळे यंदाच्या लोकसभेसाठी दोन टप्प्यांमध्ये घसरलेल्या मतदानाचा फटका भाजपाला बसणार असल्याचे तर्क लावले जात आहेत.
महाराष्ट्रात दुसर्या टप्प्यात आठ लोकसभा मतदारसंघांत मिळून 2019 मध्ये 62.8 टक्के मतदान झाले होते, ते यावेळी 59.6 टक्क्यांवर घसरले आहे. अमरावती आणि वर्धा या दोन मतदारसंघांतील मतांची टक्केवारी 2019 च्या निवडणुकीतील टक्केवारीच्या जवळपासची आहे. अन्य सहा मतदारसंघांमध्ये टक्केवारीतील तुलनात्मक फरक अनेकांची चिंता वाढवणारा ठरला आहे. बुलढाण्यात 63.6 वरून 58.45, अकोल्यात 60.6 वरून 58.09 वर, यवतमाळमध्ये 62.56 वरून 57 वर, हिंगोलीत 66.84 वरून 60.79 वर, नांदेडमध्ये 65.69 वरून 59.57 वर आणि परभणीत 63.12 वरून 60.09 वर टक्केवारी घसरली आहे.
टक्केवारी घसरण्यामागे तीव्र उन्हाळा हे कारण असल्याचे सांगितले जात असले तरी राजकीय अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार मतदारांची उदासीनता हे खरे कारण आहे. पहिल्या टप्प्यात 102 मतदारसंघांमध्ये मतदान झाले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेमध्ये यावेळी 3.8 टक्के कमी मतदान झाले. त्यातही उल्लेखनीय बाब म्हणजे भाजपच्या प्रभावक्षेत्रात पाच टक्के मतदान कमी झाले आहे, तर इंडिया आघाडीतील पक्षांच्या प्रभावक्षेत्रातील मतदानातील घट अडीच टक्के आहे. दुसर्या टप्प्यात ज्या 13 राज्यांतील 88 मतदारसंघांमध्ये मतदान झाले. यापैकी 64 जागा भाजपकडे आणि 24 जागा इंडिया आघाडीतील पक्षांकडे होत्या.
या टप्प्यात केरळमधील संपूर्ण वीस जागांवर मतदान झाले. कर्नाटकातील 14, राजस्थानातील 12, महाराष्ट्र आणि यूपीतील प्रत्येकी 8, मध्य प्रदेशातील 6, बिहारमधील पाच तसेच छत्तीसगड आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी तीन अशा जागांचा या टप्प्यात समावेश होता. दुसर्या टप्प्यातील ज्या 24 जागा इंडिया आघाडीकडे होत्या, त्यातील वीस जागा केरळमधील असल्यामुळे तिथे भाजपला काही संधी नाही. उलट महाराष्ट्र, राजस्थान, बिहार, कर्नाटकमधील अनेक जागांवर इंडिया आघाडीतील पक्षांना संधी असल्याचे चित्र दिसते.
पहिल्या टप्प्यातील संथ मतदानानंतर भाजपचे कार्यकर्ते आणि मतदार बाहेर पडत नसल्याचे भाजपच्या अंतर्गत अहवालातून समोर आले होते. यानंतर निवडणूक प्रचारानंतर पंतप्रधानांनी निवडणूक हिंदू-मुस्लिमकडे वळवली होती. मात्र दुसऱ्या टप्प्यातील मतदारांच्या वृत्तीने भाजपची निराशा झाली आहे. यावेळी भाजप यूपीमध्ये मिशन 80 चालवत आहे, परंतु दुसऱ्या टप्प्यात यूपीमध्ये केवळ 54.85 टक्के मतदान झाले जे संपूर्ण देशात सर्वात कमी आहे. त्यामुळे येथेही भाजपची चिंता वाढली आहे.
यामध्येही मथुरामध्ये सर्वात कमी मतदान झाले आहे, त्यामुळे येथून निवडणूक लढविणार्या हेमा मालिनी यांचीही धाकधूक वाढली आहे. अयोध्येपाठोपाठ भाजपने मथुरेत कृष्णजन्मभूमीचा मुद्दा तापवला आहे. मात्र मतदानाची स्थिती पाहता मथुरेचा मुद्दा जनतेने नाकारल्याचे स्पष्टपणे म्हणता येईल. दुसऱ्या टप्प्यात यूपीत मेरठ, बागपत, गाझियाबाद, गौतम बुद्ध नगर, बुलंदशहर, अमरोहा, अलीगढ आणि मथुरा या आठ जागांवर मतदान झाले. पण अयोध्या आणि मथुरा या दोन्ही मुद्द्यांचा मतदारांवर काहीही परिणाम झाला नसल्याचे निवडणुकीत स्पष्ट झाले. उत्तर भारतात एकूण 55 टक्के मतदान झाले, त्यापैकी उत्तर प्रदेशमध्ये सर्वात कमी 54.93 टक्के मतदान झाले. बिहारमध्ये 55.08 टक्के मतदान झाले. दोन टप्पे मतदान होऊनही हिंदुत्वाचा मुद्दा चालत नसल्याने भाजपमध्येच पेच निर्माण झाला आहे.