भंडारा/दै.मू.वृत्तसेवा
नेहमी वादग्रस्त विधान करून प्रसिद्धी झोतात राहणारे धीरेंद्र शास्त्री उर्फ धीरेंद्र गर्ग यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. भंडारा जिल्ह्यात बागेश्वर बाबाचा सत्संग सुरु होता. यावेळी धीरेंद्र शास्त्री यांनी सत्संगात मानव धर्माचें संस्थापक जूमदेव महाराज यांच्या विरुध्द वादग्रस्त विधान करत टीका केली. यामुळे धीरेंद्र शास्त्री विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्याची देखील मागणी करण्यात आली आहे. सूरजलाल अंबुले यांच्या तक्रारीवरून धीरेंद्र शास्त्रींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी शहरात धीरेंद्र शास्त्री म्हणजे बागेश्वर बाब यांचा सत्संग सुरू आहे. यावेळी त्यांनी मानवधर्माचे संस्थापक जूमदेव महाराज यांच्याविरुध्द आक्षेपार्ह विधान करत टीका केली. त्यामुळे लाखो अनुयायांची मनं दुखावल्या प्रकरणी भंडारा गोंदिया जिल्हयातील विविध पोलीस ठाण्यांत धीरेंद्र शास्त्रींविरूद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र अजूनही कुठली कारवाही झाली नसल्यानं, हजारोच्या संख्येने सेवकांनी मोहाडी पोलिस स्टेशन गाठले. त्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडण्याची परिस्थिती निर्माण झाली. नागपूर, गोंदिया, भंडारा जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते उपस्थीत झाले.
दरम्यान, आमदार भोंडेकर आणि सेवक परिवारातील पदाधिकाऱ्यांनी सकाळी भंडारा येथे पत्रकार परिषद घेऊन धीरेंद्र शास्त्रींना दुपारपर्यंत अटक करण्याची मागणी केली. त्यानंतर त्यांनी भंडारा पोलिसांत तक्रारही केली. दुपारी आमदार भोंडेकर व सेवक मंडळी आपल्या वाहनांतून मोहाडी येथे जात असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन कारधा ठाण्यात आणले. तिकडे मोहाडी येथील पोलिस ठाण्यापुढे जिल्ह्यातून आलेल्या सेवकांनी मोठी गर्दी केली होती. सेवकांची गर्दी पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. यांनतर परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिस अधीक्षकांनी आयोजक व धिरेंद्र शास्त्री यांच्या विरुध्द 295 कलम अन्तर्गत गुन्हा दाखल केला आहे.
कथावाचक धीरेंद्र शास्त्री म्हणाले कि नागपूर आणि भंडारा या क्षेत्रामध्ये एका विशेष संप्रदायाला मानणारा वर्ग आहे. ते हनुमानजींना तर मानतात मात्र, हनुमानजींची पूजा करणे मानत नाही. श्राद्ध करायचे नाही, माता पित्यांचे फोटो ठेवायचे नाहीत, राम राम बोलायचे नाही, जय गुरुदेव बोला…जो हनुमान संपूर्ण जीवनभर राम राम बोलला, त्यांचे उपासक राम राम नाही बोलणार. हद्द झाली यार…रसगुल्ला खात आहेत…मात्र शुगर असल्याचे सांगत आहेत. असे करणाऱ्या लोकांनी कान उघडून ऐकावे की, तुमचे पूर्वज नरकात गेले आहे, तुमची येणारी पिढी पण नरकात जाईल. अशी भक्ती हनुमानजींना कधीच प्रिय नाही, असे विवादित वक्तव्य बागेश्वर बाबांनी भागवत सप्ताहात केले.
यापूर्वी नागपूरमध्येही धीरेंद्र शास्त्री यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेही त्यांच्याविरोधात आवाज उठवला होता. बाबांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्यांचे दावे सिद्ध करण्याचे आवाहन दिले होते. मात्र धीरेंद्र शास्त्री अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दिलेले आवाहन स्वीकार न करताच पळून गेले होते.
धीरेंद्र शास्त्री सत्संग व दरबाराच्या माध्यमातून अशास्त्रीय, अवैज्ञानिक, घटनात्मक तरतुदीविरोधी भाष्य आणि अंधश्रद्धला खतपाणी घालणारी वक्तव्ये, कृती, दावे करत असतात. त्याला महा. अंनिसने आक्षेप घेऊन बाबांवर गुन्हा नोंदवून कारवाई करण्याची मागणी शासन यंत्रणेकडे केली आहे. तसेच बाबा जे अशास्त्रीय, अवैज्ञानिक, वक्तव्य, दावे, कृती करत आहे, त्यासंबंधी बाबांनी सोयीच्या ठिकाणी, नियंत्रित परिस्थितीत आणि वकील, पोलीस अधिकारी, निवडक कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील निवडक तज्ञ मंडळींच्या कमिटीसमोर दावे, कृती सिद्ध करावेत, बाबांना 21 लाखांचे बक्षीस दिले जाईल असे आव्हान बाबांना महा. अंनिसने वेळोवेळी दिले आहे. मात्र ते आव्हान बाबा लेखी स्वरूपात स्वीकारत नसल्याचे महा. अंनिसचे पूर्णवेळ कार्यकर्ते विशाल विमल यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात सांगितले होते.