मुंबई/दै.मू.वृत्तसेवा
लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांचा प्रचार सुरू आहे. दरम्यान, वेगवेगळ्या नेत्यांची वक्तव्येही सुरू आहेत. महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी विधान केल्याने खळबळ उडाली आहे. हेमंत करकरे यांचा मृत्यू दहशतवादी कसाबच्या गोळीने नाही तर संघाशी संबंधित असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याच्या गोळीने झाला, असा सनसनाटी दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. त्यांच्या या विधानाने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांना लागलेली गोळी ही दहशतवाद्याच्या बंदुकीतील नव्हती तर संघाशी समर्थित पोलीस अधिकाऱ्याने झाडली होती. हे सत्य भाजपाचे उत्तर मध्य मुंबईतील उमेदवार प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम अॅड.उज्ज्वल निकम यांनी न्यायालयापासून लपवून ठेवले. देशद्रोही व्यक्तीला लोकसभेचं तिकीट देणारा भाजप देशद्रोह्यांना पाठिंबा देणारा पक्ष आहे का, असा थेट सवालही वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.
आपण हे एस.एम. मुश्रीफ यांच्या पुस्तकाचा दाखला देऊन बोललो आहे. यामध्ये मी काहीही म्हटले नसून विलासराव देशमुख त्यावेळी म्हणाले होते की, कसाबला फाशी झाली म्हणजे श्रेय घेण्याची गरज नाही. कारण कसाब दहशतवादी होता, त्याला फाशी होणारच होती. त्यामुळे बडेजावपणा दाखवायची गरज नाही. मी एस.एम. मुश्रीफ यांच्या पुस्तकाचा दाखला दिला असून याबाबत उज्वल निकम यांना काही खुलासा करायचा असेल तर त्यांनी करावा, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.
दरम्यान, वडेट्टीवारांच्या या वक्तव्यानंतर उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली. ते न्युज 18 शी बोलत होते. विजय वडेट्टीवार यांनी निरधारा आरोप केले असून याबद्दल मला वाईट वाटतंय. यामुळे पाकिस्तान सरकारला फायदा होऊ शकतो. ते असे दावे कशाच्या आधारे करत आहेत हे मला माहीत नाही. असं उज्ज्वल निकम म्हणाले.
निकम पुढे म्हणाले की, फाशीपूर्वी कसाबने एका न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर कबूल केले होते की मुंबई हल्ल्याच्या वेळी त्याने आणि लष्कर-ए-तैयबाचे भरती इस्माईल खान यांनी पोलिस जीपवर अंदाधुंद गोळीबार केला होता, ज्यामुळे करकरे आणि पोलीस पथकातील इतर दोघांचा मृत्यू झाला होता.
मुंबईतील उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून भाजपने विद्यमान खासदार पूनम महाजन यांचे तिकीट कापून त्यांच्याऐवजी निवृत्त सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना लोकसभेच्या मैदानात उतरवलं आहे. निकम यांनी मुंबई दहशतवादी हल्ल्यात सरकारची बाजू मांडली होती. निकम यांच्या विरोधात काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड रिंगणार आहेत.