मुंबई/दे.मू.वृत्तसेवा
मुंबईतील शिवाजी पार्क येथे रविवारी भारत जोडो न्याय यात्रेची समारोप सभा झाली. सभेला काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी, कांग्रेचे राष्ट्रीय अध्यक्ष मलिकार्जून खरगे, नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूख अब्दुल्ला, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी कांग्रेस पाटी (शरद पवार) चे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वीनी यादव आणि डीएमकेचे प्रमुख आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॉलिन उपस्थित होते. यावेळी सभेला संबोधित करताना नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूख अब्दुल्ला यांनी ईव्हिएम मशीन संदर्भात मोठे विधान केले आहे. ईव्हीएम मशीन चोर, आघाडीचे सरकार आलं तर मशीन काढून निवडणूक आयोगाला मुक्त करणार, असे ते म्हणाले.
नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांनी जाहीर सभेला संबोधित करताना म्हणाले की, तुम्हाला मत वाचवायचे आहे. हे मशिन (ईव्हीएम) चोर आहे, मशीन काढण्यासाठी आम्ही खूप आवाज केला पण तसे झाले नाही. भारत आघाडीचे सरकार आले तर मशीन काढून निवडणूक आयोगाला मुक्त करणार. निवडणुकीच्या तोंडावर पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किमती वाढल्याचा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले, आपण एकत्र येऊन संविधान वाचवू आणि भारत वाचवूया.
दरम्यान तेजस्वी यादव म्हणाले कि एका बाजूला नफरत पसरविली जातेय. लोकांनी निवडून दिलेल्या सरकारांना केंद्रीय एजन्सी मार्फत पाडले जात आहे. तर दुसऱ्या बाजूला राहुल गांधी यांनी नफरत संपविण्यासाठी यात्रेच्या माध्यमातून काम केले. मोहब्बत की दुकान सुरू केले. लोकांना घाबरवले जातेय. आमचं लक्ष मोदींना हरविणे नाही तर त्यांच्या विचारधारा हरविण्याचे काम करायचे. आम्ही मोदींच्या धमक्यांना घाबरणार नाही. सत्तेत असो किंवा नसो आपल्याला लोकात जाऊन काम करावे लागणार आहे. महाराष्ट्र राज्यात ऑपरेशन लोटस झाले. त्यानंतर आता सत्तेत असलेले कोणी लोक लीडर नाही डीलर दिसत आहे. येणाऱ्या निवडणुकीत बिहार राज्यात धक्का देणारा निकाल देणार, असं तेजस्वी यादव म्हणाले.
भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोप सभेमध्ये काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी सत्ताधारी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका केली. राजा की आत्मा ईव्हीएममध्ये आहे हे खरे आहे. नरेंद्र मोदी ईव्हीएमशिवाय निवडणुका जिंकू शकत नाहीत, असा खळबळजनक दावा राहुल गांधी यांनी केला. विरोधीपक्षाला ईव्हीएम दाखवावे, ईव्हीएमबरोबर मतदान केल्यानंतर वीवीपॅट स्लीप डब्ब्यात पडते. त्याचीही मोजणी करा. अशी मागणी विरोधी पक्षांनी केली, परंतु निवडणूक आयोग नकार देत आहे. मोदी जनतेची दिशाभूल करत आहेत. नरेंद्र मोदींकडे भ्रष्टाचाराची मक्तेदारी आहे. इलोक्टोरोल बाँडमधून खंडणी वसुली केली जाते, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
देशातील सर्व विरोधी पक्ष एका पक्ष किंवा एका व्यक्तीच्या विरोधात लढत आहेत हे चुकीचे आहे. एका व्यक्तीला चेहरा बनवनू पुढे केले आहे. आम्ही या शक्तीच्या विरोधात लढत आहोत. नरेंद्र मोदी हा केवळ मुखवटा आहे. मोदींची 56 इंचाची छाती नाही, मोदी एक पोकळ व्यक्ती आहे. राजा की आत्मा ईव्हीएममध्ये आहे हे खरे आहे. ईडी, सीबीआय सारख्या भारताच्या प्रत्येक संस्थेत राजाचा आत्मा आहे. भिती दाखवून पक्ष फोडले जात आहेत. पक्ष सोडणारे सर्वजण घाबरून भाजपात गेले आहेत. देशातील मीडिया हातात नाही. महागाई, बेरोजगारी, शेतकरी, महिलांचे प्रश्न आहेत पण ते दाखवले जात नाहीत.
यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की. मुंबई हे सर्वात शक्तीशाली शहर आहे. सर्व देशाचे लक्ष मुंबईवर आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले यांची भूमी आहे, इथला विचार सर्व देशात पोहचतो. मोदींनी किती गॅरंटी दिल्या व त्या पूर्ण केल्या का? असा सवाल केला. आज लोकशाही व संविधान अबाधित ठेवणे आपली जबाबदारी आहे. संविधान बदलणे सोपे नाही पण तसा प्रयत्न केला तर देशात मोठी क्रांती होईल असा इशारा दिला.