मुंबई/दै.मू.वृत्तसेवा
राज्य सरकारने वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पासाठी एका घरामागे एक पार्किंग देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र हा निर्णय ना.म.जोशी मार्ग आणि नायगावसाठी लागू करण्यात आलेला नाही. त्यामुळे या चाळीत राहणारे रहीवासी नाराज आहेत. ना.म.जोशी मार्ग चाळ पुनर्विकास प्रकल्पातही एका घरामागे एक पार्किंग द्यावी अशी मागणी ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळीतील रहिवाशांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर आता मागणीबाबत मतदानाच्या आधी ठोस आश्वासन मिळाले नाही तर आम्ही मतदानावर बहिष्कार टाकू असा इशारा या चाळीतील रहिवाशांनी दिला आहे.
ना. म. जोशी मार्ग, नायगाव आणि वरळी बीडीडी चाळीचा पुनर्विकास म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून केला जात आहे. ना. म. जोशी मार्ग चाळीचा पुनर्विकास सर्वात आधी सुरु होऊनही हा पुनर्विकास संथ गतीने सुरु आहे. ना.म.जोशी मार्ग चाळीनंतर सुरु झालेल्या वरळी आणि नायगावच्या प्रकल्पाने वेग घेतला आहे असे म्हणत ना.म.जोशी मार्ग येथील रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली होती. याची दखल घेत म्हाडा अधिकाऱ्यांनी नुकतीच एक संयुक्त बैठक घेतली आणि प्रकल्पाला वेग देण्यात येईल तसेच एप्रिल २०२६ पर्यंत पहिला टप्पा पूर्ण करून १२६० घरांचा ताबा देऊ असे आश्वासन दिले. या आश्वासनानंतर समाधान झाल्याचे रहिवाशांकडूनच सांगितले गेले. पण आता मात्र रहिवाशांनी थेट मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.
राज्य सरकारने वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पासाठी एका घरामागे एक पार्किंग देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार तेथील पुनर्विकास मार्गी लावला जात आहे. असे असताना हा निर्णय ना.म.जोशी मार्ग आणि नायगावसाठी मात्र लागू करण्यात आलेला नाही. तेव्हा यावर आक्षेप घेत ना. म.जोशी मार्ग बीडीडी पुनर्विकास समितीनेही हा निर्णय लागू करण्याची मागणी केली आहे. मात्र त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे आता रहिवासी आक्रमक झाले असून त्यांनी याबाबत मतदानाच्या काही दिवस आधी ठोस आश्वासन द्यावे, अन्यथा मतदानावर बहिष्कार टाकू असा इशारा दिला आहे. ना.म.जोशी मार्ग चाळीत अंदाजे 2500 घरे असून मतदानावर बहिष्कार घातला तर किमान आठ हजार मतदार मतदान न करण्याची शक्यता आहे.
याशिवाय दादर शिवाजी पार्क मैदानातील लाल मातीमुळे उडणाऱ्या धुळीच्या मुद्यावरून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पालिकेला नोटीस पाठवून मैदानातून 15 दिवसांत माती काढण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार माती काढण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, कामाच्या संथगतीमुळे माती काढा अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार घालू, असा पवित्रा शिवाजी पार्क रहिवासी संघटनेने घेतला आहे.
बोरिवली खाडीपलीकडे असलेल्या गोराई गावात मागील काही दिवसांपासून पाणीपुरवठा होत नसल्याने तेथील तीन हजारांहून अधिक कुटुंबांना भीषण पाणी संकटाचा सामना करावा लागत आहे. पाण्याची समस्या सोडवण्यासाठी ते जादा दराने टँकरचे पाणी विकत घेत आहेत. तर, काही कुटुंब गावातील विहिरीतील अशुद्ध पाणी आणत आहेत. त्यामुळे गोराईकरांनी आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेत ‘नो वॉटर, नो व्होट’चा नारा दिला आहे.
ठाणे जिल्हयातील घोडबंदर गावातील रस्ता सध्या एखाद्या जलतरण तालावासारखा झाला आहे. रस्त्याला गटारगंगेचे स्वरुप आल्याने बुधवारी रहिवासी रस्त्यावर उतरले. ही गटारगंगा तत्काळ बंद केली नाही तर मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा रहिवाशांनी केला आहे.
कल्याण मधील विठ्ठलवाडी स्टेशन समोरच कल्याण-डोंबिवली पालिका बीओटी तत्त्वावर शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधत आहे. त्याचे काम एका खासगी कंत्राटदाराला दिले आहे. त्याच्याकडून वालधुनी नदीपात्रात भराव टाकला जात आहे. त्याठिकाणी भली मोठी भिंत बांधली जाणार आहे. त्यामुळे नदीपात्रालगत असलेल्या नागरिकांना पावसाळ्यात पुराचा धोका आहे. त्यामुळे हे काम बंद करा नाहीतर मतदानावर बहिष्कार टाकू, असे नागरिकांनी बजावले आहे.